
मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्यावर सातत्याने कर्णधार म्हणून अनपेक्षित कामगिरीमुळे टीका होत आहे. हार्दिकच्या नेतृत्वात या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. मुंबईला शुक्रवारी 3 मे रोजी केकेआरकडून पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर दिग्गज इरफान पठाण याने हार्दिकच्या कॅप्टन्सीसह टीमच्या कामगिरीवरही प्रतिक्रिया दिली.

इरफान पठाणने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. इरफान म्हणाला हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे. मुंबई टीम ऑन पेपर तगडी आहे. मात्र नीट हाताळता आलं नाही, असं इरफानने म्हटलं.

"क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा मोठा फरक पडतो. टीमला सांभाळण फार महत्त्वाचं असतं. खेळाडूंनी कॅप्टनचा मान राखायला हवा, हे फार महत्त्वाचं आहे", असं इरफानने म्हटलंय.

मुंबईला केकेआरकडून 24 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने 169 धावा केल्या. केकेआरसाठी वेंकटेश अय्यर याने 70 धावांची खेळी केली.

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईचं 145 धावावंर पॅकअप झालं. कॅप्टन हार्दिक 1 रन करुन आऊट झाला. तर सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली.

मुंबईने आतापर्यंत या हंगामात 11 सामने खेळले आहेत. मुंबईला 11 पैकी फक्त 3 सामन्यातच यश आलंय. तर तब्बल 8 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय.