
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपासून भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ परतला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. मागच्या पर्वात भारताने कांस्य पदक मिळवलं होतं. मात्र आता भारताचं लक्ष्य सुवर्ण पदकावर असणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनशी झाला. या सामन्यात परिस्थिती विपरीत असूनही भारताने ब्रिटेनला लोळवलं. फक्त दहा खेळाडूंसह चिवट झुंज दिली आणि सामना बरोबरीत सोडवला. तसेच पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटेनला 4-2 ने पराभूत केलं. यात गोलकीपर श्रीजेशची महत्त्वाची भूमिका राहिली.

उपांत्यपूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटेनला पराभूत करताच भारताला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. उपांत्य फेरीपूर्व एका अर्थाने गुड लक मिळालं असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. वर्ल्ड टेस्ट रँकिंगमध्ये भारताला फायदा झाला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ सातव्या स्थानावर होता. पण सेमीफायनल गाठताच पाचवं स्थान गाठलं आहे. भारताला दोन अंकांचा फायदा झाला आहे. नेदरलँडने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली असून पहिल्या स्थानावर आहे. तर जर्मनीचा संघ दुसर्या स्थानावर आहे. तर ग्रेट ब्रिटेन, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाचं नुकसान झालं आहे.

उपांत्य फेरीत भारत आणि जर्मनी यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 6 ऑगस्टला होणार आहे. हा सामना रात्री 10.30 वाजता होणार आहे. या सामन्यात जिंकल्यानंतर भारताचं एक पदक निश्चित होणार आहे. दरम्यान, दुसरा सामना नेदरलँड आणि स्पेनमध्ये होणार आहे. (सर्व फोटो- हॉकी इंडिया ट्वीटर)