
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील भारत पाकिस्तान अतितटीच्या सामन्यात रोहित सेनेने विजय मिळवला. पाकिस्तानसमोर अवघ्या 119 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला 113 धावा करता आल्या.

भारताकडून ऋषभ पंतने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्यानंतर सर्वाधिक धावा या अक्षर पटेलने केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. फलंदाजीत खोलपणा असूनही 119 धावांवर समाधान मानावं लागलं

ऋषभ पंत आपल्या शैलीत खेळत होता. पाकिस्तानकडून त्याला अनेकदा जीवदान मिळालं. पण 42 धावांवर असताना मोहम्मद अमीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताच्या धावसंख्येचा वेग मंदावला. असं असताना 11 व्या स्थानावर आलेल्या मोहम्मद सिराजने 7 धावा केल्या.

मोहम्मद सिराजने 7 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या. याच 7 धावा पाकिस्तानला महागात पडल्या. कारण पाकिस्तानचा संघ फक्त 113 धावा करू शकला. भारताने 6 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पण पाकिस्तानला विजयासाठी 7 धावा तोकड्या पडल्या.

पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगच्या हाती षटक होतं. या षटकात अर्शदीपने 11 धावा दिल्या आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला.

मोहम्मद सिराजने शेवटी येत 7 धावा केल्याने भारताला विजयात मदत झाली. अन्यथा पाकिस्तानचा विजय सहज सोपा झाला असता. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने 4 षटकं टाकली आणि 19 धावा दिल्या. मात्र एकही विकेट घेता नाही.