
नागपुरात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी संयुक्तपणे विशाल जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. यावेळी मोर्चामध्ये वंचित तसेच काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात मोदी, संघाला विरोध दर्शनवणारे बॅनर्स होते.जनआक्रोश मोर्चा सुरू होण्याआधी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सरकारच्या नीतीवर टीका केली.

सध्या परदेशात जे काही सुरू आहे, त्यावर नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला. तसेच, भारताचे सार्वभौमत्त्व मोदी यांनी अमेरिकेपुढे गहाण ठेवलं आहे, अशी टाकाही या मोर्चात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव एपस्टीन फाईलमध्ये आलेले आहे, असा दावा करत याबाबतचा जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे वंचितने सांगितले.एपस्टीन फाईलवाला पंतप्रधान देशाला नको आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.