चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो रोजगार धोक्यात; नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार चाकण MIDC तील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. या समस्यांना कंटाळून 20 लघुउद्योग खंडाळा MIDCमध्ये स्थलांतराच्या तयारीत आहेत.

Chakan MIDC : राज्यात देशातील तसेच परदेशी कंपन्यांनी यावे, उद्योग थाटावा यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी कंपन्यांना वेगवेगळी सूट आणि सुविधा दिल्या जातात. राज्यात कंपन्यांनी आपला उद्योग थाटला तर नव्या रोजगाराची निर्मिती होईल. तरुणांना काम मिळेल, हाच यामागचा उद्देश असतो. परंतु आता राज्यातील चाकण एमआयडीसीमधील तब्बल 20 कंपन्या आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्या आपले प्लांट बंद करून इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. यामुळे चाकण एमआयडीसीमध्ये तब्बल 4000 कामगारांवर संकट येण्याची शक्यता आहे.
चाकणमध्ये नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार चाकण MIDC तील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. या समस्यांना कंटाळून 20 लघुउद्योग खंडाळा MIDCमध्ये स्थलांतराच्या तयारीत आहेत. यामुळे सुमारे ४ हजार कामगारांच्या रोजगारावरही संकटाची शक्यता आहे. या कंपन्या जर खंडाळा एमआयडीसीत स्थलांतरीत झाल्या तर सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम होईल. यासोबतच तब्बल चार हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
इथे उद्योग करणं म्हणजे…
वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांमुळे चाकणमध्ये उद्योग करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे. “इथे उद्योग करणं म्हणजे गळ्यात धोंडा बांधून पाण्यात उडी मारण्यासारखं आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळेच आता चाकण एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे. सरकार आता या मागणीकडे कसे पाहणार? या 20 कंपन्या स्थलांतरीत होऊ नयेत म्हणून सरकार नेमकं काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
