
लग्नानंतर समर आणि स्वानंदी यांनी एका नवीन नात्याची सुरुवात केली आहे. स्वानंदीने परंपरांनी नटलेल्या या घरात त्यांनी आपापल्या भूमिकांची जुळवाजुळव करत नव्या अध्यायात पहिलं पाऊल टाकलं आहे. सत्यनारायण पूजेची तयारी सुरू होताच नव्या सुनेला लाकडी चुलीवर प्रसाद बनवण्याची जबाबदारी मिळाली आहे.

परंपरेचा मान ठेवत समर तिच्यासोबत उभा राहण्याचा निर्णय घेतो. लाकडी चूल पेटवण्याच्या प्रयत्नात स्वानंदीला अडचणी येतात. तेव्हा दम्याचा त्रास असूनही समर तिच्या मदतीला पुढे सरसावतो. धुराने त्याला त्रास होऊ लागला तरीही तो स्थिर राहून स्वानंदीची साथ देतो.

दोघं एकत्र प्रसाद बनवत असताना समरला तिचा शांत आणि संयमी स्वभाव मोहून टाकणार आहे. पूजेदरम्यान स्वानंदीच्या लक्षात येतं की प्रसाद खारट झाला आहे आणि ती घाबरून जाते. समर मात्र शांतपणे परिस्थिती हाताळतो.

गोंधळ पूजेला उपस्थित राहिलेला समर स्वानंदीला मनापासून प्रार्थना करताना पाहतो. स्वानंदी देवाकडे सगळ्यांचा विश्वास जिंकण्याची ताकद मागते. लग्नाच्या रात्री आजी दोघांना खोलीत बंद करते तेव्हा समर स्पष्ट सांगतो की हे लग्न फक्त एक करार आहे.

हे ऐकून स्वानंदी पूर्णपणे हादरून गेली आहे. पण वाढत्या भावनांच्या संघर्षात हरवलेला समर हळूहळू या नात्याने स्वतःमध्ये सुरू झालेला बदल ओळखू लागला आहे. या क्षणांनंतर समरला कळतं की ऑफिसच्या खात्यातून पंधरा लाख रुपये गायब झाले आहेत आणि तपासात त्याचा भाऊ अंशुमानचं नाव समोर येतं.

त्याच वेळी स्वानंदीला देखील लॉकरचा कोड माहीत असल्याचं समरला समजतं आणि त्याच्या मनात संशयाचं सावट पसरतं. यामागचं नेमकं सत्य काय असेल, समर आणि स्वानंदीच्या नात्यात मीठाचा खडा पडेल कि साखरेचा गोडवा भरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.