मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे

| Updated on: Feb 09, 2020 | 6:40 PM

"हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे", असं मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले (Abhijit Panse on MNS Maha Morcha).

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झालं. आता या मोर्चानंतर राज ठाकरेचं पुढचं धोरण काय असणार? याबाबत मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे (Abhijit Panse on MNS Maha Morcha). मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती पानसे यांनी दिली.

“आजच्या मोर्चानंतर याच आठवड्यात राज ठाकरे महाराष्ट्राच्या विविध भागांचा दौरा करतील. हे भगवं वादळ फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरु झालं आहे. अनेकजण मनसेत प्रवेशासाठी इच्छूक आहेत. मोठमोठ्या नेत्यांचा मनसेत प्रवेश होत आहे. त्यामुळे आता महराष्ट्राचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हातात असेल”, असा दावा अभिजीत पानसे (Abhijit Panse on MNS Maha Morcha) यांनी केला.

“मोर्चाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. लोकं हिंदू जीमखान्यापासून आझाद मैदानापर्यंत चालत आले. हा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या भूमिकेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत”, असंदेखील अभिजीत पानसे म्हणाले.

‘घुसखोरांना हाकलायलाच हवं’

“केवळ झेंडा बदलला म्हणून आम्ही हिंदूत्त्व झालो हे चुकीचं आहे. हिंदूत्व आमचा अजेंडा नव्हता, अशातला काही भाग नाही. हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार दहिहंडी उत्सव साजरा केला. झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली नाही. आजची जी भूमिका आहे ती पक्षाच्या आणि राजकारणापलीकडची भूमिका आहे. आज या देशात अनधिकृत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहत असतील तर त्यांना हाकलायलाच हवं”, असं अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केलं.