मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

| Updated on: Jan 03, 2022 | 8:04 PM

1 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आणि मालमत्ता करमाफीबाबत महत्वाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपले चिरंजिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.

मुख्यमंत्री म्हणाले, आदित्यने माझा ताण कमी केला, तर भाजप नेते म्हणतात तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला!
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीच्या मणक्याबाबत नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका आणि हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर 1 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला आणि मालमत्ता करमाफीबाबत महत्वाची घोषणा केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपले चिरंजिव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं कौतुक केलं. आदित्य ठाकरे यांनी आपला ताण कमी केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

‘आता आदित्य आहे. जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि केवळ काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबई म्हणून, मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेनाप्रमुखांनी जे काम सुरु केलं. रस्त्यांचं काम कसं सुरु आहे, नालेसफाईचं काम कसं चाललं आहे, सौंदर्यीकरणाचं काही असेल तर तिथे कसं सुरु आहे आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देत. हे पाहत मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्यांची कामं, साधारण ही कामं मध्यरात्रीनंतर सुरु होतात. आता दिवसाही कामं होतात. पण नालेसफाईचं काम त्या काळात काही ठिकाणी नाल्यात उतरुनही पाहिलं आहे. मग दहिसर नदीचं काम असेल, अजून कुठलं काम असेल. आता हा माझा ताण आदित्यने पूर्णपणे कमी केला आहे’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.

भातखळकरांचा ठाकरे पिता-पुत्रांना जोरदार टोला

तर दुसरीकडे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. आदित्य ठाररे यांच्यामुळे उपनगरातील लोकांचं टेन्शन वाढलं आहे. तौत्के, निसर्ग चक्रीवादळ आलं, लोकांच्या घरात पाणी शिरलं तरी आदित्य ठाकरे एकदाही फिरकले नाहीत. एक मात्र नक्की की तुमच्या पावलावर पाऊल ठेवत ते देखील मंत्रालयात पाऊल ठेवत नाहीत. जनप्रतिनिधी हे तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी नाही तर जनतेचं टेन्शन कमी करण्यासाठी असतात. त्यामुळे तुमचं टेन्शन कमी झालं असलं तरी जनतेचं टेन्शन वाढलंय हे नक्की, अशा शब्दात भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर टोलेबाजी केलीय. या महापालिका निवडणुकीत कुणाकडेही नेतृत्व द्या, जिंकणार तर भाजपचं, असा दावाही भातखळकर यांनी केलाय.

इतर बातम्या :

Photo : खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता