तुमच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही?, अनिल परबांचा भाजपला सवाल; कामगारांना संप मागे घेण्याचं आवाहन

| Updated on: Nov 11, 2021 | 2:04 PM

एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज एसटी कामगारांच्या पाठी उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण का केलं नाही? (anil parab slams bjp over merger of MSRTC into the state government)

तुमच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही?, अनिल परबांचा भाजपला सवाल; कामगारांना संप मागे घेण्याचं आवाहन
एसटी संप, अनिल परब
Follow us on

मुंबई: एसटी कामगारांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज एसटी कामगारांच्या पाठी उभे राहणाऱ्यांनी त्यांचं सरकार असताना एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण का केलं नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. तसेच एसटी कामगारांना पुन्हा एकदा संप मागे घेण्याचं आवाहनही परब यांनी केलं आहे.

अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल परब यांनी केला. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. एसटी व्यवस्थित धावत होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हानच त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं.

हा संप कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला

कामगारांनी पहिल्यांदा संप मागे घ्यावा. लोकांची गैरसोय होत आहे. एसटीच्या विलनीकरणाची त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांना कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन झालेल्या समितीसमोरच ही मागणी मांडावी लागणार आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच आम्ही संपकऱ्यांवर कारवाई करत आहोत. कोर्टाच्या आदेशाने आम्हाला जसं बंधन आहे. तसंच त्यांनाही बंधन आहे. कामगारांच्या इतर सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात पगारवाढीची मागणी सोडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. उरलेल्या मागण्यांबाबत चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल. लोकांची गैरसोय चालू ठेवून काही उपयोग होणार नाही. सरकार चर्चा करायला तयार आहे. पण ही पद्धत नाही. कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला हा संप आहे, असं ते म्हणाले.

चर्चेची दारं खुली आहेत

कालही आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली होती. आजही चर्चेला तयार आहोत. काल सदाभाऊ खोत यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. पण त्यांनी बाहेर जाऊन वेगळंच काही तरी सांगितलं. आजही त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो. उद्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करूया म्हणाले. माझी आजही चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षनेत्यांसोबतही चर्चेची तयारी आहे. माझी चर्चेची दारं खुली आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. पण हा प्रश्न जेवढा चिघळेल तेवढं एसटीचं नुकसान होईल. तुमचंही नुकसान होईल. अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या एसटीचं आणखी नुकसान होऊ देऊ नका. आपण त्यातून मार्ग काढूया, असं आवाहन त्यांनी केलं.

विलनीकरण चार दिवसात होत नाही

विलनीकरणाची मागणी चार दिवसात होणारी नाही. त्यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागतो. हे नेत्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे. पण नेते भडकवत असतील तर दुर्देवाने कामगारांचं नुकसान होत आहे. कामगार राजकारणाचे बळी ठरले तर दुर्देव आहे, असं ते म्हणाले. कोर्टानेच समिती तयार केली आहे. आम्ही जीआर काढला. त्यात शासकीय लोकं आहेत. त्यामुळे समिती बनली आहे. नव्या मागण्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. मी वस्तुस्थिती सांगत आहे. त्यात चुकीचं असेल तर सांगा, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: साहेब, हातजोडून विनंती आहे सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर आज 37 गेले, उद्या 370 होतील; एसटी कामगारांचा ‘कृष्णकुंज’वर टाहो

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!

(anil parab slams bjp over merger of MSRTC into the state government)