मुंबई : राज्यात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तसंच राज्यात सत्तांतर होऊन महिना लोटला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटलं. त्यावेळी त्यांनी राज्यपालांना एक निवेदनही दिलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरुन अजित पवारांवर टोलेबाजी केलीय. अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहा महिन्यांपूर्वीचा अभ्यास करायला हवा होता. मागील अडीच वर्षातील फाईल सही होण्याची गती आणि आताची वेळ आणि गती यात जमीन आसमानचा फरक आहे, असं प्रत्युत्तर शेलार यांनी दिलंय.
शेलार पुढे म्हणाले की, अडीच वर्षाची तक्रार असेल तर ती मग बरोबर आहे. या सरकारचा कामाचा वेग आणि फाईलवर सह्यांची गती ही कित्येक पटीने आधीच्या सरकारपेक्षा जास्त आहे. बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून बसल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी जितकी झिडकारण्याची भाषा करत आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने वाईट भाषा आता शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख, नेते वापरत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून खुपत असतील, अशी टीकाही शेलार यांनी केलीय.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या तिथीप्रमाणे असलेल्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बाबासाहेबांचे लिखाण, त्यांनी त्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा प्रत्यक्षात आपल्यासमोर उभा केलेला शिवाजी महाराजांचा जीवनपट हे बाबासाहेब यांचं योगदान आहे. लोकशाहीमध्ये यासंदर्भात मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रयत्नातून निर्माण केलेल्या वाङ्ममयला अपमानित करावं किंवा अपभ्रंष करावं, याची मान्यता प्रगल्भ लोकशाहीत नसते एवढच मला म्हणायचं आहे, अशा शब्दात शेलार यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केलीय.
त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने मुंबईत केलेली प्रभाग रचना अतर्क्य होती, ती अवैध होती. जनगणना झाली नव्हती. एका अनुमानावर असं झालं असतं तर त्यावर प्रभार रचना केली होती. या प्रभागरचनेला शास्त्रीय आधार नाही, हेच भाजपचं म्हणणं आहे, असं सांगता मिलिंद देवरा आणि फडणवीसांच्या भेटीबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचं शेलार यांनी सांगितलं.