काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा! थोरात म्हणाले, काँग्रेसला विजयाचा विश्वास

| Updated on: Sep 23, 2021 | 3:25 PM

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातल्याची चर्चा! थोरात म्हणाले, काँग्रेसला विजयाचा विश्वास
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपकडूनही संजय उपाध्याय यांचं नामांकन दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. (Balasaheb Thorat’s explanation that only Rajya Sabha elections were discussed with Devendra Fadnavis)

एखाद्या दुर्दैवी घटनेमुळं जागा रिक्त होते तेव्हा महाराष्ट्राची परंपरा आहे की ती निवडणूक बिनविरोध करायची. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आपण कोअर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितल्याचं थोरात म्हणाले. या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही, असंही थोरात म्हणाले.

काँग्रेसला विजयाची खात्री – थोरात

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातलं अशी चर्चा सुरु असल्याचं पत्रकार म्हणाले. त्यावेळी लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हमून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले.

फडणवीसांनी काँग्रेसला कोंडीत पकडलं?

दरम्यान राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळेच राष्ट्रवादी-शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंत्या कराव्या लागल्या?

राष्ट्रवादी-शिवसेना नाराज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

इतर बातम्या :

राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते फडवीसांच्या भेटीला, राष्ट्रवादी-शिवसेना नाराज, फडणवीसांनीही कोंडीत पकडलं!

कार्यकर्ते म्हणाले ‘आमचे सोडून सगळ्यांचे होर्डिंग्स लागतात’, मग राज ठाकरेंचं उत्तर काय?

Balasaheb Thorat’s explanation that only Rajya Sabha elections were discussed with Devendra Fadnavis