उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? आता काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा : चंद्रकांत पाटील

| Updated on: Sep 02, 2020 | 4:34 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death).

उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? आता काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा : चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनासोबतच रोजउठून अनेक नवे संकटे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापूर्तीसाठी ते मुख्यमंत्री झाले असतील तर इच्छापूर्तीसाठी एक आणि काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा”, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे (Chandrakant Patil on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death).

‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकड यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुण्याचे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“जम्बो हॉस्पिटलकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या हॉस्पिटलबाहेर स्क्रिन लावलं पाहिजे. स्काईपवर सर्व नातेवाईकांना बोलायला दिलं पाहिजे. रुग्ण कोव्हिड सेंटरमध्ये गेला तर एकतर तो बरा होऊन येतो नाहीतर थेट स्मशानभूमीत जातो. रोजच्या रोज नातेवाईकांशी बोलल्यानंतर तो पेशंट बरा होईल. कोणतीही संवेदनशीलता नाही. एक घर म्हणून सरकार चालवावं. मात्र तसं नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“पुणे-मुंबई दोन तासांचं अंतर आहे. मुंबईत कोरोना काळात काय काम आहे? कामं असतील तर निम्मे दिवस तिथे तर निम्मे दिवस इथे राहा, असं अजित पवारांना मी वारंवार म्हणतो”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं (Chandrakant Patil on TV9 Marathi Pune Reporter Pandurang Raykar Death).

“उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही. पण मुख्यमंत्री झाले. अजित पवार यांना त्यांच्या मताचा अधिकार मिळाल्यापासून ते आमदार आहेत. कोणतंही सरकार येऊ दे ते आहेतच. मग ते देवेंद्रजींसोबत उपमुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरेंसोबतही उपमुख्यमंत्री आहेत. ही ताकद ते वापरणार आहेत की नाहीत? ते कडक हेडमास्तर आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. पण त्यांनी ते दाखवलं पाहिज”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“दिल्लीच्या बरोबरीने पुण्याची कोरोना परिस्थिती झाली. पुणे पावणेदोन कोटी लोकसंख्येचं आहे. पणे 50 लाखांच्या लोकसंख्येचं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी न घेता दिल्लीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणली. अजित दादा जवळ गेलं तरी लांबलांब म्हणतात. तब्येतीची काळजी घेतली पाहिजेच. पण मग परिस्थिती नियंत्रणात कशी आणणार?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

‘अजित पवारांना प्रश्न विचारले पण उडवाउडवीचे उत्तरे दिले’

“पांडुरंग रायकर यांचं निधन ज्याप्रकारे झालं आहे, ते आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावणारं आहे. अतिशय विचार करायला लावणारी आणि मनात भीती निर्माण करणारी घटना आहे. रुग्ण वाढत जातील हे गृहित धरुन तीन जम्बो हॉस्पिटल उभी करायचं ठरलं. त्यानंतर दोन करायची ठरली. दोन्ही आता कार्यान्वित झाली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“जम्बो हॉस्पिटल उभे करताना मी अजित पवारांकडे वारंवार प्रश्न उपस्थित करत होतो की, तुम्ही हॉस्पिटल उभं कराल, पण मेडिकल यंत्रणेचं काय? डॉक्टर, नर्सेस कुठून आणणार आहात? त्यावर केरळमधून किंवा इथूनतिथून आणणार असे उडवाउडवीचे उत्तर दिली गेली. शेवटी जे व्हायचं ते झालं”, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली.

“जम्बो सेंटरमध्ये चक्क सहा तास रुग्णाकडे बघायला कुणी नाही. कोव्हिड सेंटर असल्याने आपण आत जावू शकत नाही. त्यामुळे किती ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, डॉक्टर किती आहेत? याचा पत्ता नाही. त्यातूनच पांडुरंग रायकर यांचं निधन झालं आहे. त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत. खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे पूर्णपणे अव्यवस्था आणि असंवेदनशीलता आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला भाजपकडून पाच लाखांची मदत जाहीर

“खरंतर छोटी 100, 200 क्षमतेची कोव्हिड सेंटर उभी केले पाहिजेत. ते व्यवस्थापनाला सोपी पडतात. त्यामुळे ही घटना विचार करायला लावणारी घटना आहे. मी पांडुरंग रायकर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या आगामी काळात ज्या अडचणी आहेत त्यासाठी भाजपकडून आपदा कोषच्यावतीने पाच लाख रुपये घोषित केले आहेत. पाच लाख ही रक्कम मोठी रक्कम नाही. आगामी काळात आपण सगळ्यांनी रायकर यांच्या कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

घरात बसण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं नाही, उद्धव ठाकरेच पांडुरंगच्या मृत्यूला जबाबदार : संदीप देशपांडे

चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा मृत्यू अंतर्मुख करायला लावणारा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : देवेंद्र फडणवीस

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम