
Devendra Fadnavis : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सूनेत्रा पावर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजितदादा यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी पक्षात घडामोडी वाढल्या आहेत. येत्या 12 फेब्रवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी गटाचे विलीनीकरण होणार होते, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे खुद्द खासदार शरद पवार यांनीच अजित पवार आणि माझ्यात याविषयाची चर्चा झाली होती, असे सांगितले आहे. त्यानंतर आमदार जयंत पाटील यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या. लवकरच विलीनीकरणाची घोषणा केली जाणार होती, असे सांगितले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित विलीनीकरणावर थेट भाष्य केले आहे. त्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकार यावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र अस्तित्त्व असलेला पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय तेच घेतात. आमची त्यांचे मित्र आहोत. ते आमच्या सोबत राहिलेले आहेत. म्हणूनच आम्ही त्या पक्षासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, शरद पवार, जयंत पाटील यांच्या दाव्यावर बोलताना दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. अजितदादा आमच्या सरकारमध्ये आहेत. सरकारमध्ये असताना आमच्याशी चर्चा न करता ते विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकतील का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विलीनीकरणाची तारीख ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं अशी पुष्टीही फडणवीस यांनी जोडली. आता शरद पवार आणि अजितदादा यांच्यात काय बोलणं झालं, याची मला कल्पना नाही. मी आमच्यापुरतं सांगतो की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तारखेची कल्पना आम्हाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.