Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट, अजित पवारांबद्दल म्हणाल्या…
Sunetra Pawar: दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी.... उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट...., सध्या सर्वत्र सुनेत्रा पवार यांच्या पोस्टची चर्चा...

Sunetra Pawar: राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. बुधवारी अजित पवार यांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज भवनातील लोक भवनात शपथविधी सोहळा पार पाडला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुनेत्रा पवार यांची इन्स्टाग्रामवरील पोस्ट
“आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन.
View this post on Instagram
या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” सध्या सुनेत्रा पवार यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.
सुनेत्रा पवार यांना मिळालेली खाती
उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना आता महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवार यांच्याकडे असलेलं महत्त्वाचं अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. सांगायचं झालं तर, सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
अजित पवार यांचं निधन
बुधवारी सकाळी मुंबईहून बारामती येथे सभेसाठी निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. विमानात अजित पवार यांच्यासह पाच अन्य लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 8.30 वाजता अजित पवार यांचं विमान अपघातात निधन अशी बातमी समोर आली आणि संपूर्ण राज्याने कामाचा माणूस गमावला… अजित पवार यांचं घड्याळ, चष्मा आणि जॅकेटवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणातील हलचालींनी वेग धरला आहे.
