मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?, अशोक चव्हाणांचा सवाल

| Updated on: Dec 02, 2020 | 2:46 PM

कोणीही मुद्दाम बॉलिवूड महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ नये, असेही अशोक चव्हाणांनी सांगितले. (Ashok Chavan on UP CM Yogi Adityanath Mumbai  Visit) 

मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य, सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल?, अशोक चव्हाणांचा सवाल
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचं वास्तव्य महाराष्ट्रासह मुंबईत आहे. मुंबईत सर्व सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल, असा प्रश्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोणीही मुद्दाम बॉलिवूड महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाऊ नये, असेही अशोक चव्हाणांनी सांगितले. (Ashok Chavan on UP CM Yogi Adityanath Mumbai  Visit)

बॉलिवूड कोणी कुठेही घेऊन जावं, असा प्रश्न उद्भवत नाही. महाराष्ट्र किंवा मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य आहे. अनेक कलाकार हे मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत सवलती सोयी, फिल्मसिटी, लोकेशन यासारख्या विविध ठिकाणं आहेत. काही वेळा परदेशात जाऊनही शूटींग केली जाते. त्यामुळे कोणी मुद्दाम बॉलिवूड कुठे घेऊन जावू नये, असे अशोक चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नये. शूटींग करण्याइतपत लोकेशन महाराष्ट्रात आहेत. फिल्मसिटी आहे.सर्व गोष्टी आहेत. एवढं असताना कोणी युपीला जाईल, असे वाटत नाही, असेही अशोक चव्हाणांनी सांगितले.

अशोक चव्हाणांची ट्वीटरवरुन टीका 

दरम्यान काल (1 डिसेंबर) अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही,” असे अशोक चव्हाण म्हणाले. (Ashok Chavan on UP CM Yogi Adityanath Mumbai  Visit)

“मागील 5 वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

“देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा सल्ला अशोक चव्हाणांनी दिला.

योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा 

उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी अभिनेता अक्षयकुमार याच्याशी चर्चा करून फिल्मसिटी उभारणीची माहिती घेतली आहे. आजही काही कलाकारांना भेटून ते नव्या फिल्मसिटीबाबत चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटीच्या उभारणीसाठी मुंबईत ठाण मांडलेलं असतानाच शिवसेना आणि मनसेने मात्र त्यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. तर भाजपने या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. (Ashok Chavan on UP CM Yogi Adityanath Mumbai  Visit)

संबंधित बातम्या : 

बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार; अशोक चव्हाणांची भाजपवर खोचक टीका

योगींच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं, बॉलिवूड शिफ्ट होणार?; संजय निरुपम म्हणतात…