‘..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

| Updated on: Oct 04, 2021 | 4:14 PM

विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झालीय. देगलूरमधून भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलं आहे. साबणे यांनी शिवबंधन सोडत आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या भाजप मेळाव्यात चंद्रकातं पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. (Chandrakant Patil criticizes Shivsena, Appeal to voters to win Subhash Sabane)

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

मोठी रॅली काढून साबणेंचा उमेदवारी अर्ज भरला जाणार

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यास भाजपने पहिला नंबर घेतलाय. आपण प्रचारातही बाजी मारली आहे. 7 तारखेला ते एक अर्ज भरतील. 8 तारखेला मोठी रॅली काढून सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतील, अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिलीय.

‘विजयी सभा वाटावी इतकी गर्दी कार्यक्रमाला झाली’

रस्ते खराब असल्यानं यायला उशीर झाला. खासदार प्रताप पाटील-चिखलीकरांचं भाषण विरोधकांनी लाईव्ह ऐकलं असेल, असा टोला पाटलांनी लगावला. इच्छूक उमेदवार मारोती वाडेकर यांनी दाखवलेल्या संयमाचं यावेळी पाटील यांनी कौतुक केलं. विजयी सभा वाटावी इतकी गर्दी कार्यक्रमाला झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून लोक थांबले आहेत, असं म्हणत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले.

शेतकऱ्यांना 2019 च्या जीआरप्रमाणे मदत करा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2019 च्या जीआरप्रमाणे मदत करा, अशी मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. आचारसंहितेच्या काळातही नैसर्गिक आपत्तीचे पैसे देता येतात. ते द्यायला हवेत. त्यासाठी निवडणूक आयोग सहज परवानगी देईल, असंही पाटील यावेळी म्हणाले.

खासदार चिखलीकरांचा चव्हाणांवर घणाघात

सुभाष साबणे यांना निवडून द्या, 107 आमदारांनी चमत्कार घडवला जाईल. काँग्रेसची मंडळी फक्त निवडणूक आली की इकडे येतात. येत्या 30 तारखेला कमळाचे बटण दाबा म्हणजे त्यांचा माज कमी होईल. आता त्यांनी काहीही प्रयोग केला तरी उपयोग होणार नाही. फडणवीस यांचा दौरा ठरला की मंत्री चव्हाण मुंबईचे सगळे कार्यक्रम रद्द करुन नांदेड आले आणि रात्री 9 वाजता पाहणी केली, अशा शब्दात खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला.

देगलूर तालुक्यात घोषणांचा महापूर आला नारळ फोडले आणि उद्घाटनाचे बोर्ड गायब झाले. फक्त वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला. सुभाष साबणे हा नम्र माणूस आहे. कमरेपासून वाकलेला माणूस आहे. कायम सर्वांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे, असं म्हणत चिखलीकर यांनी सुभाष साबणेंना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलंय.

इतर बातम्या :

पंढरपूर पाठोपाठ देगलूरमध्ये क्रांती होणार, सदाभाऊ खोतांचा दावा; अशोक चव्हाणांवर घणाघात

Lakhimpur Kheri Violence : कुणाचा जीव जात असेल तर जबाबदारी कुणाची? सुप्रीम कोर्टाचा सवाल

Chandrakant Patil criticizes Shivsena, Appeal to voters to win Subhash Sabane