Big News: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

| Updated on: Aug 19, 2022 | 9:27 AM

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे.

Big News: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयकडून (CBI Raid) सध्या एकाच वेळी 20 ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे. याबद्दल खुद्द सिसोदिया यांनीच ट्विट करत माहिती दिली आहे. “सीबीआयचं आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यानं आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, जेणे करून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काहीही बाहेर आलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छापेमारीतूनही काहीच साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. अन् त्याला कुणीही रोखू शकत नाही”, असं ट्वीट सिसोदिया यांनी केलं आहे. आम्ही कट्ट्र ईमानदार आहोत. लाखो बालकांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. चांगल्या कामात अडथळे आणले जात आहेत. म्हणून आपला देश पहिल्या क्रमांकावर पोहचू शकत नाही, असंही सिसोदिया म्हणाले आहेत.

चौकशी का?

दिल्ली सरकारच्या शिक्षण खात्यात घोटाळा झाल्याचा सीबीआयला संशय आहे. दिल्लीतल्या शाळांमध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचं बोललं जातं. त्या प्रकरणी सिसोदिया यांची चौकशी केली जात आहेत.

केजरीवाल यांचं ट्विट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणावर ट्विट केलंय. दिल्लीचं शिक्षण मॉडेल आणि आरोग्यतील प्रगतीबाबत जगभर चर्चा होत आहे. दिल्लीची ही वाहवा या लोकांना सहन होत नाही. ही प्रगती, ही प्रशंसा त्यांना रोखायची आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. 75 वर्षात चांगलं काम करणाऱ्यांची अडवणूक झाली. त्यामुळेच देश मागे राहिलाय. पण आमचं उद्दिष्ट दिल्लीची प्रगती आहे. त्याला कुणीही रोखू शकत नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

तर भाजपच्या वतीनेही यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सिसोदिया यांनी मागच्या काही दिवसात दिल्ली सरकारमध्ये राहून भ्रष्टाचार केला. त्यांचं हे काम लोकांच्या समोर आलं आहे. भावनिक ट्विट करून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भाजपने म्हटलंय.