पावसात भिजावं लागतं, हा अनुभव कमी पडला, फडणवीसांचे पवारांना चिमटे

| Updated on: Oct 29, 2019 | 1:42 PM

पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या चातुर्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं.

पावसात भिजावं लागतं, हा अनुभव कमी पडला, फडणवीसांचे पवारांना चिमटे
Follow us on

मुंबई : पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला (Devendra Fadanvis Taunts Sharad Pawar) लगावला आहे. दिवाळीनिमित्त पत्रकारांसोबत रंगलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या चातुर्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं. साताऱ्यातील प्रचारसभेत शरद पवार यांनी केलेल्या भाषणादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी पावसात भिजत पवारांनी भाषण सुरु ठेवलं होतं. भाजपवासी झालेल्या उदयनराजे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला, तर राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु निवडणुकांच्या तोंडावर अनेक आमदारांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यामुळे महाआघाडीचं पानिपत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पवार ‘हिरो’ झाल्याची भावना (Devendra Fadanvis Taunts Sharad Pawar) आहे.

शिवसेनेच्या स्वप्नांना टाचणी

दरम्यान, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणलं आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

आमच्या अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. पण निवडणुकांपूर्वी कधीच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता. वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असं वाटू शकतं. वाटू शकणं आणि होणं यात फरक आहे, असं म्हणत शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला फडणवीसांनी टाचणी टोचली आहे.

1995 चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. मीडियाला सरकार स्थापनेबाबत सरप्राईज देणार, असंही फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. आतमध्ये काय आहे, हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅनची गरजच नाही, असंही फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) म्हणाले.

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुका चांगल्या पार पडल्या. निवडणुकीत महायुतीला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही लवकरच सरकार स्थापन करु. मात्र काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. फडणवीस सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त लवकरच कळेल. शक्यतो पुढच्या आठवड्यात शपथविधी पार पडेल, असे संकेतही फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिले.

भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘पंतप्रधानांनी स्पष्ट केलंच आहे, मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत विधीमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला. ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो आहोत, पण आमच्या मेरिटबद्दल कोणीच बोलत नाही, अशी खंतही (Devendra Fadanvis Taunts Sharad Pawar) त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवलं आहे.