फडणवीसांचा महाराष्ट्र दौरा, शेतकऱ्यांची विचारपूस, कोरोना परिस्थितीचा आढावा आणि पक्षबांधणी; वाचा सविस्तर

| Updated on: Jun 02, 2021 | 2:24 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा बसलेला फटका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. (Devendra Fadnavis Begins Maharashtra Tour, visits cyclone affected districts)

फडणवीसांचा महाराष्ट्र दौरा, शेतकऱ्यांची विचारपूस, कोरोना परिस्थितीचा आढावा आणि पक्षबांधणी; वाचा सविस्तर
Devendra Fadnavis
Follow us on

परभणी: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा बसलेला फटका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शेतकऱ्यांशी विचारपूस करून नुकसानीचा आढावा घेत आहेत. तसेच रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेची माहितीही घेत आहेत. त्याशिवाय पक्षाच्या आमदार-खासदारांना भेटून पक्षबांधणीवरही चर्चा करत आहेत. एकाच दौऱ्यात देवेंद्र फडणवीस तीन तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत आहेत. नजीकच्या काळात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व आले आहे. (Devendra Fadnavis Begins Maharashtra Tour, visits cyclone affected districts)

तौक्ते वादळानंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी काल जळगावला भेट दिली. आज ते परभणी आणि जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. वादळाने झालेलं नुकसान आणि कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा हा दौरा असला तरी या दौऱ्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. विशेष करून फडणवीस जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेल्याने या भेटीची जोरदार चर्चा झाली.

जळगावाचा दौरा गाजला

देवेंद्र फडणवीस काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. अर्थात खडसे हे मुंबईत होते. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीसांना चहासाठी घरी बोलावल्याने ते खडसे यांच्या घरी गेले. यावेळी आमदार गिरीश महाजनही उपस्थित होते. या भेटीत फडणवीसांनी रक्षा खडसे यांच्याशी पक्षबांधणीवर चर्चा केली. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर जळगाव भाजपला गळती लागली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाची पडझड रोखण्यासाठी फडणवीस आता स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच त्यांनी पक्ष बांधणीसाठी रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा केली. रावेर तालुक्यातील ऐनपूर, सुलवाडी, कोळदा, धामोडी, चिंचपाडा, खिरडी इत्यादी गावांमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. काही गावांमध्ये घरांचे नुकसान, तर अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

Devendra Fadnavis

 

भुसावळला सावकारेंशी चर्चा

त्यानंतर फडणवीसांनी भुसावळला जाऊन भेट दिली. यावेळी त्यांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी भुसावळमधील कोरोना परिस्थिवर चर्चा केली. तसेच सावकारे यांच्या विकास निधीतून देण्यात आलेल्या कार्डियाक अॅम्ब्युलन्सचंही त्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी सावकारे यांच्याशीही पक्षबांधणीवर चर्चा केली.

Devendra Fadnavis

जालन्यात ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन

फडणवीस आज सकाळीच जालन्यात आले. यावेळी त्यांनी जालना एमआयडीसीतील कालिका स्टिलच्या ऑक्सिजन प्लांटंचं उद्घाटन केलं. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेही होते. त्यानंतर त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. तसेच आरोग्य सुविधांचाही आढावा घेतला.

Devendra Fadnavis

परभणीत कोरोना रुग्णांशी चर्चा

त्यानंतर ते दुपारी सव्वा बारा वाजता जालन्याहून मोटारीने परभणीत दाखल झाले. यावेळी जिल्हा परिषद नूतन इमारतीतील कोविड सेंटरला भेट देवून त्यांनी सोयी सुविधांची पाहणी केली. कोविड रुग्णांशी संवादही साधला. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील सेंटरमधील आयसीयू कक्षातील कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय उपचार, औषधी तसेच अन्य सुविधाबाबत विचारपूस केली. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेडकर, तहसीलदार संजय बिरादार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब जाधव, बालाप्रसाद मुंदडा आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

सत्तांतराचे संकेत अन् चर्चांना उधाण

या दौऱ्यात फडणवीस शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. डॉक्टरांकडून आरोग्य सुविधांचा आढावा घेत आहेत. मात्र, त्याचवेळी राजकीय भाष्य करून त्यांनी आघाडीच्या तंबूत खळबळही उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील सत्तांतराचे संकेत दिले आहेत. सध्या कोविडचा काळ आहे. आमचं सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचं लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

पालिका निवडणुका आणि फडणवीसांचे दौरे

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेसह काही मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. विरोधी पक्ष कोणत्याही संकटावेळी जनतेच्या मदतीला धावून जातो. विरोधी पक्ष जनतेसोबत आहे, तसेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप काम करत आहे हे ठसवण्यासाठी फडणवीसांचे हे दौरे असून त्यात ते यशस्वीही ठरले आहेत. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी कोरोना संकटात सर्व जिल्ह्यांचे दौरे काढणं अपेक्षित होतं. तसेच ज्या जिल्ह्यांना तोक्ते वादळाचा फटका बसला तिथे सत्ताधारी मंत्र्यांनी जाणं अपेक्षित होतं, मात्र ते काम विरोधी पक्ष करत आहे. त्यातून विरोधी पक्षांबद्दलची जनतेत सहानुभूती वाढू शकते आणि त्याचा पालिका निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तसेच या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षात आलेली मरगळ झटकण्याचा आणि कार्यकर्त्यांना हुरुप देण्याचाही फडणवीसांचा प्रयत्न असून त्या अर्थानेही या दौऱ्यांकडे पाहता येईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. (Devendra Fadnavis Begins Maharashtra Tour, visits cyclone affected districts)

 

संबंधित बातम्या:

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

(Devendra Fadnavis Begins Maharashtra Tour, visits cyclone affected districts)