अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर होताच ईडीचे समन्स, काय म्हणाले संजय राऊत

| Updated on: Mar 27, 2024 | 3:32 PM

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांचे नाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर करतानच ईडीने त्यांना खिचडी घोटाळा प्रकरणात समन्स बजावले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते संजय निपरुप यांनी आमच्या डोक्यावर खिचडी घोटाळ्यातला आरोपी थोपवला जात असल्याची टीका करीत कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाला दुगाण्या झाडल्या आहे.

अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर होताच ईडीचे समन्स, काय म्हणाले संजय राऊत
amol kirtikar And sanjay raut
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा निवडणूकांची घोषणा होऊनही महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही बाजूंनी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जात नव्हती. ही कोंडी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज फोडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज लोकसभेच्या 16 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे. अमोल कीर्तिकर यांचे नाव खिचडी घोटाळ्यात असल्याने त्यांचे नाव जाहीर करताच ईडीने अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात समन्स जारी केले आहे. या प्रकरणात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे गटाने आपली लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील तीन लोकसभा मतदार संघातील उमेदवार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहेत. मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण येथून अरविंद सावंत तर मुंबई वायव्य येथून अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सांगलीतून चंद्रहार पाटील आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर होताच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्यातील आरोपीला आमच्या डोक्यावर थोपविले जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. खिचडी चोराला आपण कधीच समर्थन करणार नाही असे संजय निरुपम यांनी सांगत कॉंग्रेस पक्षांच्या नेतृत्वावर दुगाण्या झाडल्या आहेत.

शिवसेना अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी ठाम

वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर होताच. त्यांच्या विरोधात ईडीने खिचडी घोटाळा प्रकरणात समन्स जारी केले आहे. यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर हेच उमेदवार राहतील, त्यांना अजिबात बदलेले जाणार नाहीत. अमोल कीर्तिकर यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही शिवसैनिक घाबरणारे नाही, डरपोक नाही. जे घाबरणारे होते ते आधीच शिवसेनेतून पळून गेल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.