…तर पाच दिवसात पक्ष सोडणार; खडसेंचा भाजपला शेवटचा इशारा

| Updated on: Dec 21, 2019 | 8:46 AM

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे (Eknath Khadse give ultimatum to BJP).

...तर पाच दिवसात पक्ष सोडणार; खडसेंचा भाजपला शेवटचा इशारा
Follow us on

जळगाव : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे (Eknath Khadse give ultimatum to BJP). तात्काळ भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या अल्टिमेटनंतर भाजप हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे (Eknath Khadse give ultimatum to BJP).

विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा देतानाच आपल्याला इतर तिन्ही प्रमुख पक्षांकडून निमंत्रण आल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान मागील मोठ्या कालावधीपासून एकनाथ खडसे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. वेळोवेळी त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, थेट पक्षाला इशारा देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकनाथ खडसे काय निर्णय घेणार याकडे अनेकांचं लक्ष आहे.

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

दरम्यान, गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणातच खडसेंनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही, पण माझा भरोसा नसल्याचं म्हणत पक्षाला योग्य संदेश दिला होता. खडसे म्हणाले होते, “अजून पक्ष सोडायचा ठरलेलं नाही, मी पंकजाबद्दल बोलतोय, माझा भरोसा नाही, पक्षातून काढत नाहीत, आपोआप सोडून जातील अशी परिस्थिती करतात, आणि सांगायचं गोपीनाथ मुंडे असते, तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण इथे बोलायला वेळ नाही.”

देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, अशीही खंत खडसेंनी बोलून दाखवली होती.

गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी ओक्साबोक्शी रडावंसं वाटतं, आज आमच्या पाठीशी कोण आहे? अजूनही ते कुठूनही हाक मारतील असं वाटतं, जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ, असं भावनिक मतही एकनाथ खडसेंनी त्यावेळी व्यक्त केलं होतं. त्यानंतर भाजपमधील गटबाजीची आणि त्याचा खडसेंना बसलेल्या फटक्याची चर्चा चांगलीच रंगली.

मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला होता.