Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे संतप्त, उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर प्रतिप्रश्न

| Updated on: Jun 28, 2022 | 7:19 PM

संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या टीकेवरुन एकनाथ शिंदे चांगलेच संतप्त झाले आहेत. शिंदे यांनी ट्वीटद्वारे राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिंदे यांनी प्रतिप्रश्न केलाय

Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे संतप्त, उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर प्रतिप्रश्न
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या टीकेवरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चांगलेच संतप्त झाले आहेत. शिंदे यांनी ट्वीटद्वारे राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आवाहनानंतर शिंदे यांनी प्रतिप्रश्न केलाय. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल शिंदे यांनी केलाय.

आदित्य ठाकरेंची नेमकी टीका काय?

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. बरं झाली घाण गेली, असे सांगत आता यापुढे सगळे चांगले घडणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटते असे त्यांनी म्हटले आहे. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आले नसते का, असा प्रश्नही आदित्य यांनी उपस्थित केला होता.

त्यांची जिवंत प्रेत मुंबईत येतील – संजय राऊत

मुंबईतील पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली होती. त्या टीकेवरुन राऊतांवर तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार, हे मजा करतायत ते दिसतंय खात पित आहेत, उड्या मारत आहेत. ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची जिवंत प्रेत मुंबईत येतील, मग त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावं लागेल, अशा शब्दात राऊतांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती.

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

समोर बसला तर मार्ग निघेल

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केलं आहे.