पोलिसांना बेघर करु नका, मुख्यमंत्र्यांचे म्हाडा प्रशासनाला आदेश; नायगावच्या पोलीस कुटुंबियांना दिलासा

| Updated on: Jul 23, 2022 | 11:44 PM

एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन पोलिसांना बेघर करु नका, असा आदेश दिलाय. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता महाराष्ट्राची, जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवावा लागेल, असंही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

पोलिसांना बेघर करु नका, मुख्यमंत्र्यांचे म्हाडा प्रशासनाला आदेश; नायगावच्या पोलीस कुटुंबियांना दिलासा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : नायगावच्या बीडीडी चाळीतील (BDD chawl) पोलिसांना 48 तासांत घरं रिकामी करण्याचे आदेश म्हाडाकडून देण्यात आले होते. माध्यमांमधून ही बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्याची दखल घेतलीय. एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन पोलिसांना (Police) बेघर करु नका, असा आदेश दिलाय. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता महाराष्ट्राची, जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवावा लागेल, असंही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यात ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन सूचनावजा आदेश देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओमध्ये ते फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यात ते समोरच्या अधिकाऱ्याला सांगत आहेत की, पोलिसांना काहीतरी नोटीस दिलीय 48 तासात खाली करा म्हणून. तुमचा कुणीतरी अधिकारी आहे संजय पवार नावाचा. तर त्यांना सांगा तस करु नका. पोलीस पॅनिक झाले आहेत. आपण त्यांच्याबाबत आता जरा एक व्यवस्थित पॉलिसी ठरवू. पोलिसांच्या घराचा मोठा विषय आहे, आपण तो मार्गी लावूया. ते बिचारे ड्यूटी करतात. ऊन, वारा, पाऊस काही बघत नाहीत. सण, उत्सव नसतो त्यांना. तर त्यांचा घरांचा विषय मार्गी कसा लागेल बघू. उपमुख्यमंत्री साहेब आपण जरा बघू ते, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

नायगावच्या पोलीस कुटुंबियांना यापूर्वीही नोटीसा

दादरच्या नायगाव पोलीस वसाहत धोकादायक असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा यापूर्वीही देण्यात आल्या होत्या. तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नायगावमध्ये जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. पोलिसांची ही वसाहत धोकादायक वाटत नाही. सरकारने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं. या वसाहतींची दुरुस्ती करावी आणि निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

आता शिंदे, फडणवीस काय निर्णय घेणार?

तुमच्या भावना तुमच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेतू निर्माण करायचा म्हणून या ठिकाणी आलोय. तुमच्या भावना आणि अपेक्षा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करेन. पोलीस आयुक्तांशी बोलेन. या निर्णयाला स्थगिती द्यायला हवी, असंही फडणवीस तेव्हा म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.