ना पक्ष पाहतो, ना राजकीय हितसंबंध; भाजपबाबत नरमाईच्या आरोपांवर फेसबुकचे स्पष्टीकरण

| Updated on: Aug 17, 2020 | 11:32 AM

राजकीय पक्ष किंवा राजकारण न पाहता आमची कंपनी आपले धोरण लागू करते, असे फेसबुकने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे

ना पक्ष पाहतो, ना राजकीय हितसंबंध; भाजपबाबत नरमाईच्या आरोपांवर फेसबुकचे स्पष्टीकरण
Follow us on

न्यूयॉर्क : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (हेट स्पीच) नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप झाल्यानंतर फेसबुकने अमेरिकन वृत्तपत्रात स्पष्टीकरण दिले आहे. राजकीय पक्ष किंवा राजकारण न पाहता आमची कंपनी आपले धोरण लागू करते, असे फेसबुकने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. (Facebook Clarifies on allegation of  ignoring BJP Leaders Hate Speech)

“आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील” असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात फेसबुकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक पोस्टवर कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.

भारतात या प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी फेसबुक आणि भाजपला फैलावर घेतलं आहे. फेसबुकने द्वेषपूर्ण भाषण आणि पोस्टसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना फाटा देऊन भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई करणे टाळले. ही कारवाई करण्याला फेसबुक इंडियाच्या एका उच्च पदाधिकाऱ्यानेच विरोध केल्याचंही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या अहवालात म्हटलं आहे.

संबंधित फेसबुक पदाधिकाऱ्याने व्यावसायिक हितसंबंधाचे कारण सांगत भाजपशी संबंधित जवळपास चौघांशिवाय काही ग्रुपवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. फेसबुक इंडियाच्या पब्लिक डायरेक्टर अनखी दास यांनी भाजप नेत्यावरील कारवाईमुळे भारतातील फेसबुकच्या बिझनेसला नुकसान होईल, असं सांगितल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

भारत फेसबुकचं सर्वात मोठं मार्केट

यूझर्सचा विचार करता भारत हे फेसबुकसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक 346 मिलियन यूझर्स आहेत. त्यामुळेच फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई करणं टाळलं, असा आरोप होत आहे. अनखी दास यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावरील कारवाई टाळून पक्षपातीपणा केल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

(Facebook Clarifies on allegation of  ignoring BJP Leaders Hate Speech)