मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त
sonam wangchuk hunger strike : सोनम वांगचूक उपोषणावर ठाम आहेत. दुसरीकडे हायकोर्टानेही वांगचूक यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

कॉकरोच जनता पक्षाच्या जंतर-मंतर आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक हे 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, सलग 19 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचूक यांची दिवसेंदिवस तब्येत खालावू लागली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उपोषणामुळे त्यांच्या वजनात 9 किलो घट झाली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टानेही चिंता व्यक्त केली आहे.
दिल्ली हायकोर्टात सुनावणीआधी सोनम वांगचूक यांनी समर्थकांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, मी उपोषण सोडल्याने काय बदलणार आहे? मी जेवण केल्याने आंदोनलाचं उद्दिष्ट पूर्ण होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागल्याने समर्थकांची चिंता वाढू लागली आहे. अनेक राजकीय नेते त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगून उपोषण सोडण्यास सांगत आहेत. एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘माझी तब्येत इतकी गंभीर झालेली नाही, की येत्या काही दिवसांत मृत्यू होईल’.
सोनम वांगचूक यांनी सांगितलं की, मेडिकल रिपोर्टनुसार तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मी आणखी काही दिवस उपोषण करू शकतो. याचदरम्यान कॉकरोच जनता पक्षाने आज गुरुवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच सीजेपीकडून या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं लक्ष वेधलं जात आहे.
सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर हायकोर्टाकडून चिंता व्यक्त
दिल्ली हायकोर्टात सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडावे, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने महाअधिवक्ता देखील उपस्थित होते. हायकोर्टाने स्पष्ट केलं की, ‘वांगचूक यांची डॉक्टरांकडून नियमित तपासणी केली पाहिजे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण प्रत्येकांचं जीवन अमूल्य आहे’.
‘सोनम वांगचूक यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टरांकडूनच व्हावी. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, गरज भासल्यास तात्काळ हस्तक्षेप केला जावा. सर्वांचं जीवन अमूल्य आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजे, असंही कोर्टाने म्हटलं.
