Goa Election 2022 : आणखी एका आमदाराचा राजीनामा, गोव्यात काँग्रेस 4 वर्षात 17 वरून 3 आमदारांवर!
4 वर्षापूर्वी झालेल्या गोव्याच्या निवडणुकीत जवळपास 17 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला राज्य चालवण्याची संधी आली होती. मात्र हा घास भाजपा(Goa BJP)ने हिरावून घेतला. आज त्याच काँग्रेसची अवस्था 17 आमदारांवरून केवळ 3वर आलीय.
पणजी : सत्ता स्थापन करण्यास झालेला उशीर हा काँग्रेस(Goa Congress)च्या पतनास कारणीभूत ठरलाय. कारण 4 वर्षापूर्वी झालेल्या गोव्याच्या निवडणुकीत जवळपास 17 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसला राज्य चालवण्याची संधी आली होती. मात्र हा घास भाजपा(Goa BJP)ने हिरावून घेतला. आज त्याच काँग्रेसची अवस्था 17 आमदारांवरून केवळ 3वर आलीय.
रवी नाईकांची सोडचिठ्ठी आता गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस(TMC)मध्ये ते सहभागी झाले.
दोन्ही मुले भाजपात नाईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आलंय. गोव्यातील पोंडा मतदारसंघाचे (Ponda) प्रतिनिधित्व करणाऱ्या नाईक यांनी विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती, ज्यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
भाजपात जाणार? राजीनामा सादर केल्यानंतर नाईक म्हणाले, की मी राजीनामा दिलाय. पुढे काय करायचं हे लवकरच सांगेन. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नाईक हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. रवी नाईक यांचा धाकटा मुलगा रॉय नाईक यांनी सांगितलं, त्यांनी वडिलांना भाजपामध्ये येण्याची विनंती केली आहे.
भाजपाने स्थानिक पक्षांना घेतले होते सोबत राज्यातील 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तथापि, 13 जागा जिंकणाऱ्या भाजपाने गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रादेशिक संघटना आणि अपक्ष उमेदवारांसोबत युती केली. तेव्हापासून अनेक काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलाय.
भाजपाला टक्कर गोवा निवडणुकीपूर्वी टीएमसीनेही निवडणुकीची तयारी सुरू केलीय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी-Maharashtrawadi Gomantak Party) आगामी विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत युती करून लढणार असल्याचं जाहीर केलंय. सत्ताधारी पक्ष भाजपाला टक्कर देण्यासाठी युतीने सुशासन हा मुख्य निवडणूक मुद्दा बनवला आहे.
सर्वात जुना पक्ष टीएमसीसोबत गोव्याचा सर्वात जुना प्रादेशिक पक्ष एमजीपी आणि राज्याच्या राजकारणात प्रवेश केलेला तृणमूल काँग्रेस यांच्यातील युतीची घोषणा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या 13 डिसेंबर रोजी राज्याच्या दौऱ्यापूर्वी झाली आहे. युतीबाबत अधिक माहिती नंतर दिली जाईल, असं एमजीपीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavlikar) यांनी पत्रकारांना सांगितलं. ते म्हणाले, की 40 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पक्ष आपापसात जागा वाटून घेतील.
‘चांगली कामगिरी करणार’ तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे गोवा प्रभारी महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले, की बॅनर्जी यांच्या राज्याच्या दौऱ्यापूर्वी युतीचा तपशील सार्वजनिक केला जाईल. आदल्या दिवशी ढवळीकर म्हणाले, की एमजीपीच्या केंद्रीय समितीने तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले, की त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीने तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ढवळीकर म्हणाले, की राज्यात सुशासन देण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.