योगी आदित्यनाथांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री का केलं? अमित शाहांचा खुलासा

| Updated on: Jul 28, 2019 | 8:36 PM

भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र, अचानक ही सर्व नावं मागे पडत आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. त्यावेळी देशभरात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री का करण्यात आले हा प्रश्न विचारला गेला.

योगी आदित्यनाथांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री का केलं? अमित शाहांचा खुलासा
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशच्या 2017 मधील विधानसभेचा निकाल लागला त्यावेळी देशभरात भाजपच्या या यशाचे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, त्यापेक्षा अधिक मोठा धक्का उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाली तेव्हा बसला. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र, अचानक ही सर्व नावं मागे पडत आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली. त्यावेळी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री का करण्यात आले हा प्रश्न अनेकदा विचारला गेला. मात्र, हा निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यावेळी या निर्णयावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. आता मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी या निर्णयामागील कारणांचा खुलासा केला आहे.

अमित शाह उत्तर प्रदेशमध्ये आयोजित ग्राऊंड ब्रेकिंग सेरिमनी-2 मध्ये बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही (पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी) योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेक लोकांनी ते राज्य कसं चालवणार, त्यांनी तर आतापर्यंत साधी नगरपालिकाही चालवली नाही, कधी मंत्री म्हणूनही काम केलेले नाही, ते संन्यासी आहेत, असे म्हटले. त्यावेळी आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात होतो जी दृढनिश्चयी असेल आणि कठोर परिक्षम करण्याची तयारी असेल. हेच आम्हाला आदित्यनाथ यांच्यात दिसले. त्यानंतर आम्ही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आदित्यनाथ यांच्याकडे दिली. आज योगी आदित्यनाथ यांनी आमचा विश्वास सिद्ध केला आहे.”

‘उत्तर प्रदेशमध्ये नवी सुरुवात’

शाह यांनी उत्तर प्रदेशमध्ये नवी सुरुवात झाल्याचेही सांगितले. ते म्हणाले, “मी गुजरातचा असून सर्वात आधी ग्राऊंड ब्रेकिंग सेरिमनी या कार्यक्रमाची सुरुवात तेथेच झाली होती. मात्र, योगी आदित्यानाथ यांनी खूप कमी वेळेत या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली. आज उत्तर प्रदेशमध्ये एक नवी सुरुवात होत आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्यात आर्थिक उलाढालींना वेग येऊन रोजगारनिर्मिती होईल. याचा युवकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.”