Explainer | जगातील पहिले निवडणूक चिन्ह, राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हाचे वाटप कसे केले जाते? घ्या जाणून

| Updated on: Mar 18, 2024 | 11:39 PM

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशात दोन प्रमुख राजकीय पक्ष होते. पहिला काँग्रेस आणि दुसरा मुस्लिम लीग. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर दोन बैलांची जोडी हे काँग्रेस पक्षाचे चिन्ह होते. तर, अर्धा चंद्र आणि तारा हे मुस्लिम लीगचे चिन्ह होते.

Explainer | जगातील पहिले निवडणूक चिन्ह, राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हाचे वाटप कसे केले जाते? घ्या जाणून
party symbol
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक यामध्ये निवडणूक चिन्हे ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणूक चिन्हापुढील बटण दाबूनच आपण कोणत्याही उमेदवाराला मतदान करतो. राष्ट्रीय पक्ष असोत वा छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवार या सर्वांनाच निवडणूक चिन्ह दिले जाते. बॅलेट पेपरवरील चिन्ह पाहून मतदार त्याच उमेदवाराला मतदान करू शकतात याची खून म्हणजेच निवडणूक चिन्ह. हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून दिले जाते. यासाठी काही नियम आहेत का? याची सुरवात कधीपासून झाली या सारखे काही प्रश्न जनतेच्या मनात येतात त्याचे हे उत्तर…

चिन्ह देण्याची सुरवात अमेरिकेतून झाली

234 वर्षांपूर्वी अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत फेडरलिस्ट पार्टी हा पहिला संघटित राजकीय पक्ष स्थापन झाला. या पक्षाचे चिन्ह गोलाकार अंगठी होते. त्या अंगठीचा रंग काळा होता. हे जगातील पहिले निवडणूक चिन्ह. येथूनच जगभरातील संघटित पक्षांमध्ये निवडणूक चिन्हांची प्रक्रिया सुरू झाली.

भारतात चिन्ह देण्यास केव्हा सुरुवात झाली?

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी देशात काँग्रेस आणि मुस्लिम लीग असे दोन पक्ष होते. काँग्रेसचे दोन बैलांची जोडी हे चिन्ह होते. तर, 1906 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम लीग या पक्षाला अर्धा चंद्र आणि तारा हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. पण, भारतात पक्ष, चिन्ह, निवडणूक चिन्हाच्या प्रवासाची खरी सुरवात 1951 नंतर झाली. 28 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 दरम्यान देशात पहिली सार्वत्रिक निवडणुक झाली. या निवडणुकीत 14 पक्ष रिंगणात उतरले होते. देशात त्या काळात निरक्षर लोकांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे निवडणुकीत लोकांचा सहभाग अधिका वाढवा यासाठी चिन्ह देण्याचा प्रयोग करण्यात आला.

निवडणूक चिन्हांचे प्रकार किती?

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पक्षाला दोन प्रकारची निवडणूक चिन्हे दिली जातात. यातील पहिले आरक्षित निवडणूक चिन्ह असते आणि दुसरे स्वतंत्र निवडणूक चिन्ह. राखीव निवडणूक चिन्ह म्हणजे ते फक्त एकाच पक्षाला दिले जाते. तर, स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जो कोणत्याही पक्षाचा नाही त्याला किंवा नवीन पक्ष, ठराविक मतदारसंघातील उमेदवार याला दिले जाते.

निवडणूक आयोगाने चिन्ह दिले

भारतात निवडणुका घेणे, पक्षाला चिन्ह देणे ही कामे निवडणूक आयोग करते. निवडणूक आयोग द इलेक्शन सिम्बॉल्स (आरक्षण आणि वाटप) ऑर्डर, 1968 नुसार प्रादेशिक आणि राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह वाटप करते. निवडणूक आयोगाकडे विविध निवडणूक चिन्हे आहेत. निवडणूक चिन्हांसाठी दोन याद्या तयार केलाय जातात.

पहिल्या यादीत गेल्या काही वर्षांत वाटप करण्यात आलेल्या चिन्हांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या यादीत अशी चिन्हे आहेत जी इतर कोणालाही दिली गेली नाहीत. निवडणूक आयोग नेहमीच अशी किमान 100 चिन्हे राखीव ठेवतो जी आजपर्यंत कोणालाही दिली गेली नाहीत. परंतु, एखाद्या पक्षाने स्वतःचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाला दिले आणि ते चिन्ह कोणाकडेही नसेल तर आयोग ते चिन्ह त्या पक्षाला देतो.

चिन्ह काढून घेऊ शकतो का?

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा न मिळालेल्या नवीन राजकीय पक्षाला चिन्ह दिल्यानंतर आयोग ते गोठवू शकतो. 2012 मध्ये निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या नाईक पक्षाला झाडू हे निवडणूक चिन्ह दिले. त्यावेळी आम आदमी पक्षाला राज्य आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला नव्हता.

2012 च्या विधानसभा निवडणुकीत नाईक पक्षाने 9 विधानसभा जागा लढवल्या. पण, तो पक्ष सर्वच जागांवर पराभूत झाला. 2014 मध्ये नाईक पक्षाला त्याच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवायची होती. परंतु निवडणूक आयोगाने हे निवडणूक चिन्ह गोठवले. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 28 जागा जिंकल्या त्यामुळे निवडणूक आयोगाने झाडू हे चिन्ह आम आदमी पक्षाला देण्याचा निर्णय घेतला.