‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान, माफी मागा’, नाना पटोले आक्रमक

| Updated on: Apr 08, 2021 | 3:20 PM

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान, माफी मागा, नाना पटोले आक्रमक
महाराष्ट्रातील कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन नाना पटोले यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर टीका
Follow us on

मुंबई : कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन आता महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार वाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. (Union Health Minister Dr, Harshwardhan should apologize to Maharashtra, Nana Patole demanded)

‘महाराष्ट्राची माफी मागा’

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा नाना पटोले यांनी घेतलाय. कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

‘प्रत्येक गोष्टीत भाजपचं राजकारण’

भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. राज्यात सध्या रक्ताचा साठाही कमी आहे. आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे घेत आहोत. 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहोत. कोरोनामुक्त बुथ असं अभियानही हाती घेत आहोत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात कोरोना वॉर रुम सुरु करत आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात कोरोना हेल्पलाईन सुरु करतोय. मदत आणि पुनर्वसन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही मंत्र्यांना आम्ही याची जबाबदारी देत असल्याची माहिती पटोले यांनी दिलीय.

डॉ. हर्षवर्धन यांना महाराष्ट्र सरकारवर निशाणा

एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच टाकलंय.

लस तुटवड्याचे आरोप निराधार – डॉ. हर्षवर्धन

‘गेल्या काही दिवसांत मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरुन केलेली वक्तव्य ऐकली. हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपशय झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. याबाबत जबाबदारीनं वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भीती निर्माण केली जातेय. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारांनाही माहिती दिली जात आहे. त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत’, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : कोरोना लसीचा तुटवडा, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!

Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!

Union Health Minister Dr, Harshwardhan should apologize to Maharashtra, Nana Patole demanded