विश्वजित कदमांना ‘करेक्ट कार्यक्रम’ची आठवण, तर ‘मी छोटा माणूस’ म्हणत जयंत पाटलांची टोलेबाजी, दोन्ही नेत्यांच्या भाषणाची चर्चा

| Updated on: Oct 17, 2021 | 11:35 PM

जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा-भाळवणी येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात मिश्कील टोलेबाजी पहावयास मिळाली.

विश्वजित कदमांना करेक्ट कार्यक्रमची आठवण, तर मी छोटा माणूस म्हणत जयंत पाटलांची टोलेबाजी, दोन्ही नेत्यांच्या भाषणाची चर्चा
JAYANT PATIL VISHWAJEET KADAM
Follow us on

सांगली : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा-भाळवणी येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रकुल कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात मिश्कील टोलेबाजी पहावयास मिळाली. या दोघांनीही भाषणादरम्यान एकमेकांवर मोकळ्या मनाने टोलेबाजी केली.

जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमची मुलाखत चांगलीच रंगली 

खानापूर मतदारसंघाच्या बाबतीत मी बोलणार नाही. त्यामुळे आखाड्याच्या कार्यक्रमात राजकीय आखाडा व्हायला नको. जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमची मुलाखत चांगलीच रंगली होती. पण खरं सांगायचं झालं तर ते तसे नाहीत. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मागे ते खंबीरपणे उभे असतात, अशी टीप्पणी विश्वजित कदम यांनी केली. जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रम या प्रसिद्ध अशा वक्तव्याचा विश्वजित कदम यांनी विशेष उल्लेख केला.

विश्वजित कदम यांच्यासारखा मी मोठा माणूस नाही

तर दुसरीकडे जयंत पाटील यांनीदेखील भाषणादरम्यान दिमाखदार शैलित मिश्किल टोलेबाजी केली. पैलवान चंद्रहार पाटील यांची सुरुवात राजारामबापू पाटील यांच्या तालमीतून सुरू झाली. यावरून बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, “चंद्रहार पाटील हे राजारामबापू कारखान्यातील तालमीच्या मातीशी जुळलेली आहेत. आमची माती शिवली की, आम्ही त्याच्या मागे असतो. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या मागे उभं राहणं माझं कर्तव्य आहे. माझी शक्ती छोटीशी आहे. मी विश्वजीत कदम यांच्याएवढा मोठा माणूस नाही. जेवढे काही थोडीबहुत आहे ते मागे उभा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार,” असा मिश्कील टोला जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांना लगावला.

ऑगस्ट महिन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

दरम्यान, हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांच्यात राजकीय रस्सीखेच पाहायला मिळते. ऑगस्ट महिन्यात विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातीलच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनदेखील काँग्रेसला खिंडार पाडल्यामुळे येथे अनेक चर्चा रंगली होती.

जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यातील टोलेबाजी, पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला

दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता 24 ऑक्टोबरला; 2 हजार 739 रिक्त पदे भरणार

कांदे-बटाटे-टोमॅटोच्या महागाईपासून दिलासा! केंद्राचं मोठं पाऊल, दिल्ली-मुंबईतील कांद्याचे दर काय?