मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात; फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील

| Updated on: Nov 19, 2020 | 1:05 PM

मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. (jayant patil taunt devendra fadnavis over bmc election)

मुंबई महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात; फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. (jayant patil taunt devendra fadnavis over bmc election)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना जयंत पाटील यांनी हा दावा केला. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असून आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष महापालिकेत एकत्र येणार असून सत्ता आणण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, वीजबिल माफीच्या प्रश्नावर उत्तर देण्यास पाटील यांनी नकार दिला. या प्रश्नावर ऊर्जा मंत्रीच योग्य आणि सविस्तर उत्तर देतील, असं ते म्हणाले.

काल मुंबईत भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीसाठी बुथ स्तरापासून बांधणी करा. राजकारणाचा अभ्यास असलेल्या तरुणांकडे वॉर्डांची जबाबदारी सोपवा, अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या.

आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. ठाकरे सरकारचा माज आम्ही उतरवणार आहोत. जनतेच्या पैशांची लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असाही प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला होता.

 

संबंधित बातम्या:

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

(jayant patil taunt devendra fadnavis over bmc election)