किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम ! अमोल मिटकरी म्हणतात ‘…तर विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका’

| Updated on: Sep 19, 2021 | 6:55 PM

कायदा व सुव्यवस्था तसेच किरीट सोममय्या यांना कोणतीही इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, असे मिटकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असा सूचक इशाराही मिटकरी यांनी दिलाय.

किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम ! अमोल मिटकरी म्हणतात ...तर विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका
AMOL MITKARI AND KIRIT SOMAIYA
Follow us on

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर प्रवेशबंदीची नोटीस आल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मला अटक करण्यासाठी माझ्या घरासमोर मोठा फौजफाटा आलेला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध केलं आहे, असं म्हणत निषेध केला आहे. या सर्व आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप तसेच किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय. कायदा व सुव्यवस्था तसेच किरीट सोममय्या यांना कोणतीही इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे, असे मिटकरी यांनी सांगितले आहे. तसेच सोमय्या यांनी घरीच थांबाव, अन्यथा महागात पडू शकतं असा सूचक इशाराही मिटकरी यांनी दिलाय. (Kirit somaiya is prohibited to inter in kolhapur for security and safety reasons said amol mitkari criticizes bjp)

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटीस देण्यात आली

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्याच आरोपांची सखोल माहिती घेण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. मात्र त्याआधीच सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस आलेली आहे. त्यानंतर मला स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना “सोमय्या यांचं हे विधान हास्यास्पद आहे. मागील अनेक दिवसांपासून सोमय्या स्टंटबाजी करत आहेत. सोमय्या विदर्भात वाशिममध्ये गेले होते. त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या शाळेला भेट दिली होती. या भेटीनंतर तेथे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काल परवा त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यानंतर सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची एक नोटीस आली आहे. सोमय्या यांना कोठेही इजा तसेच त्रास होऊ नये म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे,” असे मिटकरी म्हणाले. तसेच त्यांच्या आरोग्याची तसेच त्यांची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे सगळं करण्यात येत आहे. त्याचा सोमय्या यांनी राग मानू नये, अशी अपेक्षादेखील मिटकरी यांनी व्यक्त केलीय.

भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय

सोमय्या यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही नोटीस देण्यात आली आहे. सोमय्या हे छावा किंवा वाघ आहेत, असं होत नाही. केंद्राने त्यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे छावणीचं स्वरुप आलं आहे. त्यांनी स्टंटबाजी करु नये म्हणूनच हा प्रयत्न केला जातोय. एटीएस तसेच महाराष्ट्र पोलीस त्यांच्यावर भाजप उठसूट तोंडसुख घेतं. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय. अशा स्टंटबाज लोकांना काही तास घरीच ठेवावं, असं पोलिसांच्या मनात असावं म्हणूनच त्यांना घरी ठेवण्यात आलं आहे, असंदेखील मिटकरी म्हणाले.

विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका

तसेच पुढे बोलताना मिटकरी यांना सोमय्या यांनी सूचक इशारा दिलाय. “जर ते कोल्हापूरला जात असतील तर सरकार काळजी घेणारच आहे. पण एखाद्या बिराडात विंचू आहे आणि त्या बिराडात मी हात टाकतो असं असेल तर मग विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका, असं आमचं म्हणणं आहे. कोल्हापुरात जाऊ नका असं सांगितलं असेल तर जाऊ नये. त्यांनी घरीच थांबावं, नाहीतर महागात पडू शकतं. आपण फार स्टंटबाज आहोत असे वाटत असेल तर त्यांनी आवश्य जावं, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सुनावलं.

सोमय्या स्थानबद्ध

दरम्यान, सोमय्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवल्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंड येथील घरात स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे.

इतर बातम्या :

किरीट सोमय्या आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी? कोल्हापुरात कशामुळे जायचं नाही? चंद्रकांत पाटील भडकले

‘कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही,’ सोमय्या यांना नोटीस येताच प्रविण दरेकर आक्रमक

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री; घराभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

(Kirit somaiya is prohibited to inter in kolhapur for security and safety reasons said amol mitkari criticizes bjp)