राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर, केशव उपाध्येंचं टीकास्त्र

| Updated on: Jun 07, 2021 | 8:10 PM

आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याचीच फळे राज्यातील जनता भोगत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात 10 व्या क्रमांकावर, केशव उपाध्येंचं टीकास्त्र
केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच प्रमाण अत्यंत चिंताजनक राहिलं आहे. त्यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याचीच फळे राज्यातील जनता भोगत आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi government over Corona death total)

राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने नुकताच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. आघाडी सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता न आल्यानेच महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. राज्य सरकारच्या या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर गेला आहे, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

‘लक्ष विचलीत करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन’

राज्य सरकारला कोरोना प्रसार रोखण्यात आलेल्या अपयशावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले. राज्य सरकारने इंधनावरील कर दोनदा वाढविले असताना त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला नाही. काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किंमतच उरलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचा फार्स केल्याची टीकाही उपाध्ये यांनी केलीय.

‘ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ’

मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथील करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम आहेत याची स्पष्टता राज्य सरकारकडून होत नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसत असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय.

कोरोना लसीकरणावरुनही राज्य सरकारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यावरुनही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला हाणलाय. “आम्हालाच परवानगी द्या आम्ही करू. 12 कोटींचे चेक तयार. ग्लोबल टेन्डर काढणार. सात दिवसात लसीकरण पूर्ण करणार. ठाकरे सरकारने नुसत्याच गावगप्पा मारल्या पण ना टेन्डर आल ना १२ कोटीचा चेक दिसला. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वाचे लसीकरणाचा निर्णय घेतला”, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.

इंधन दरवाढीवरुन चंद्रकांत पाटलांची टीका

अजितदादा आणि उद्धवजी यांचे म्हणणे असे आहे की जनतेच्या भल्यासाठी जे जे करायचे असेल ते केंद्रानेच कमी करावे, आम्ही काहीच करणार नाही ;असे चालणार नाही. पेट्रोलचे भाव आटोक्यात आणण्यासाठी इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही त्यावरील कर कमी करावा,  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.

संबंधित बातम्या :

पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू: नाना पटोले

OBC reservation : आम्ही अडचणीत, मदत करा, छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Keshav Upadhyay criticizes Mahavikas Aghadi government over Corona death total