मुंबईः भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार मार्च महिन्यात पडेल असं वक्तव्य केलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच याआधीदेखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा सरकार कधी पडेल, याची भाकितं केली आहेत, त्याविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त टीव्ही 9 ला त्यांनी खास मुलाखत दिली.
भाजप नेते नारायण राणे यांनी येत्या मार्च महिन्यात सरकार पडेल, असं वक्तव्य केलंय, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, नारायण राणेंनी हे विधान कोणत्या संदर्भाने केलंय, हे मी सांगू शकत नाही. किंवा चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडण्याविषयीचा अंदाज व्यक्त केला, त्याविषयीदेखील ते अधिक सांगू शकतील.
सरकार पडण्याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”या सरकारला पडण्याचीच खूप धास्ती आहे. त्यांना ही सत्ता म्हणजे 20-20 ची मॅच वाटते. कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं”
महाविकास आघाडी सरकार कधी पडणार या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ”हे महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधातूनच पडणार. आतापर्यंत राजकीय इतिहासच असा सांगतो. ज्या वेळेला असे सरकार येते, ते मजबूत स्थितीत वाटत असते, तेव्हा अतंर्गत विरोधातूनच ते सरकार पडते. त्यामुळे भाजप सरकार पाडणार नाही. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधातूनच पडेल.”
इतर बातम्या-