तो मुंबईच्या मॅनहोलमध्ये पडला, 100 मीटर लांब आढळला, जीव वाचवण्यासाठी झगडणाऱ्या असलम शेख यांचा मृत्यू कसा झाला?
साकिनका परिसरात एका मॅनहोलमध्ये 55 वर्षीय असलम शेख नावाची व्यक्ती अचानक पडली. ही घटना घडताच तिथे असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ मुंबई महापालिकेच्या लोकांनाही पाचारण करण्यात आले

Mumbai Rain Manhole Death : मुंबईमध्ये सध्या तुफान पाऊस चालू आहे. पुढच्या काही दिवस पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबले आहे. दरम्यान, मुंबईच्या या पावसाने पहिला बळी घेतला आहे. साकिनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं जातंय. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यात यश आले नाही. बचाव मोहिमेदरम्यान नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.
दोन तास चालले बचावकार्य
मिळालेल्या माहितीनुसार आज (2 जुलै) साकिनका परिसरात एका मॅनहोलमध्ये 55 वर्षीय असलम शेख नावाची व्यक्ती अचानक पडली. ही घटना घडताच तिथे असलेल्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ मुंबई महापालिकेच्या लोकांनाही पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बीएमसी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुमारे दोन तास बचावकार्य केले. परंतु संबंधित व्यक्ती 20 ते 25 फूट खोल असलेल्या मॅनहोलमध्ये पडली होती. मॅनहोलमध्ये पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहात होते. तर दुसरीकडे संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
100 मीटर अंतरावरील मॅनहोलमधून काढले बाहेर
मॅनहोलमध्ये पडलेल्या असलम शेख यांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. याबाबत फायर ऑफिसर ए. व्ही. सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली. पाण्याचा प्रवाह जोरात होता. संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी पडली होती, तिथून साधारण 100 मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. असलम शेक यांना बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते.
बीएमसी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान या घटनेनंतर आता राजकारण तापले आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी या घटनेला बीएमसी आयुक्तांना जबाबदार धरत राजीनाम्याची मागणी केली, तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
