Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
Mallikarjun Kharge: सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने लक्ष वेधले आहे. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चांगलेच सुनावले आहे.

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद मोर्चाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. मात्र काल रात्री या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाले. आता यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
माध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, विद्यार्थांना माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी आमची इच्छा होती की यावर चर्चा व्हावी. चर्चा झाल्यानंतर गृहमंत्री एक स्टेटमेंट देतील आणि इतर जे फ्लोअर लिडर्स आहेत त्यांना देखील त्यांची भूमिका मांडण्याची संधी द्यायला हवी. या हेतूने आम्ही आज सदनमध्ये आलो. जे सर्वांना, संपूर्ण देशाला सांगू इच्छित होते त्यांनी आमचे तोंड बंद केले आहे. लोकशाही संपवण्याचा हा प्रयत्न आहे. हे खूप विचित्र दिसत आहे. मी 60 वर्षांमध्ये असा मार्ग जो सरकारने आज निवडला आहे तो यापूर्वी कधीही पाहिला नाही. मी चौदा वेळा असेंबली, पॉर्लमेंट, लोकसभा, राज्यसभा सर्वकाही पाहिले आहे. पण असे आजपर्यंत पाहिले नाही. आमची इच्छा आहे की तुम्ही चर्चा करण्याची संधी द्या. आम्ही आमची भूमिका मांडू. का लाठीचार्ज झाला? का त्या मुलांना मारण्यात आले? आम्हाला विचारण्यासाठी देखील फोरम नाहीये तर मग आम्ही कोणाला विचारायचे? मी तुम्हा सर्वांना चेतावणी देत आहे की सरकार अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं त्यासाठीच करत आहे. कोणी विरोधक, कोणी विद्यार्थी किंवा जनता हे सगळं करत नाहीये. सरकार त्यांना उकसवत आहे जेणेकरुन देशात अराजकता निर्माण होईल. नंतर ते दाबण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. लाठीचार्ज करण्यात येईल, मारण्यात येईल आणि भीती दाखवून त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल.
“आम्हाला तुरुंगात ठेवल्यासारखे आतमध्ये ठेवले”
पुढे ते म्हणाले, दुसरी गोष्ट ही आहे की कालपण आम्ही जे बोलण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाही आम्हाला संधी दिली नाही. पण आम्हाला तुरुंगात ठेवल्यासारखे आतमध्ये ठेवले. बाहेर येऊ दिले नाही. हे काय वागणे आहे? अरे पार्लमेंटच्या बाहेर देखील खासदार येऊ शकत नाहीत तर त्यांना सुरक्षा नाहीये तर कोणाला आहे? मग देश आज एक अराजकताच्या दिशेने जात आहे आणि मोदी जी, होम मिनिस्टर यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ते त्यांचे मुद्दे सदनामध्ये मांडू इच्छीत नाहीत. त्यामुळे आम्ही अशा वागण्याचा निषेद करतो. सरकार आणि पार्टी युवकांसोबत आहे ते त्यांचे कपडे फाडण्यासाठी? मुलांना लाठी मारण्यासाठी? युवकांना दाबण्यासाठी? आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याची भाषा करताय?
