मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नुकत्याच झालेल्या एका खटल्यात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्यावर आमदारकी रद्द करण्याची मागणी होत आहे. कोकाटे यांनी सरकारच्या कारभारावर टीका करताना ओएसडी आणि पीएस मुख्यमंत्री ठरवतात असं त्यांनी म्हटलं आहे.

मस्ती कराल तर घरी जाल... आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
manikrao kokate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2025 | 1:50 PM

राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही विरोधकांकडून होत आहे. कोकाटेंवर राजकीय संकट ओढवलेलं असतानाच त्यांनी एक विधान करून राज्य सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे. आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना महायुतीचा फॉरमॅटचा मांडला. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत झालं पाहिजे. 100 दिवसांचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काहीच राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा. म्हणजे सरकार आणि आपली सांगड बसली पाहिजे. त्यामुळे समाजात एकप्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.

नशिबाने आम्ही सर्व

खतं आणि औषधाच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैराण झालं आहेत. रासायनिक शेतीकडे जाण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. मार्केट कमिट्यांमध्ये बोर्ड लावा. बाजार भाव सांगा, असं कोकाटे म्हणाले. नशिबाने आम्ही सगळे एका विचारांचे आहोत. मी गेल्यावर लोक विचारतात की सोयाबीन अजून गेलं नाही. जनतेच्या मनात पण संभ्रम आहे की कोणाला काय सांगावं, असंही त्यांनी सांगितलं.

नंतर प्रतिक्रिया देतो

दरम्यान, कोकाटे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यांना राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर माझं एकदा झालं की तुम्हाला प्रतिक्रिया देतो. जे काही कायदेशीर आहे, ते बघू. मी पात्र आहे की अपात्र आहे, ते बघू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तर आजच सुनावणी

दरम्यान, कोकाटे यांच्यावरील निर्णयावर त्यांचे वकील अविनाश भिडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 20 तारखेला कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निर्णय दिला आहे. त्याबाबत आम्ही आज अपील करत आहोत. ऑनलाईन सबमिशन दाखल केलं जाणार आहे. त्यावर सुनावणी निश्चित होईल. न्यायालयाने जे जजमेंट दिले, त्यावर आपण अपील करतोय, तांत्रिक मुद्दे आत्ता सांगू शकत नाही. आज लवकर सर्क्युलेशन झालं तर सुनावणी आजच होईल, असं अविनाश भिडे यांनी सांगितलं.