शिंदे गटातील नेत्यांना धमक्यावर धमक्या, आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Aug 04, 2022 | 8:08 PM

शिंदे गटातील आमदार आणि त्यांच्या गटाते मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी विकास गोगावले (Vikas Gogawale) यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

शिंदे गटातील नेत्यांना धमक्यावर धमक्या, आमदार भरत गोगावलेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांना धमकी
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतर झालं. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे यांच्या बंडापासून त्यांच्या गटात सहभागी झालेल्या आमदारांना आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना धमक्या येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदार आणि त्यांच्या गटाते मुख्य प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या मुलालाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी विकास गोगावले (Vikas Gogawale) यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. महत्वाची बाब म्हणजे विकास गोगावले यांनी आपल्याला वारंवार धमकीचे फोन येत असल्याचं सांगितलं आहे.

विकास गोगावले यांना फोनवरुन धमकी देण्यात आली. त्यावेळी त्यांना अर्वाच्या भाषेत शिवीवाळ करण्यात आली. धमकी देणाऱ्याने गोगावलेंना 4 – 5 दिवसांचा इशारा दिलाय. तशी तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. विकास गोगावले म्हणाले की, मला गेल्या दोन दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. माझे वडील भरत गोगावले यांनाही धमकीचे फोन येत आहेत. तुम्ही पक्ष कसा वाढवता ते आम्ही पाहतो, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही या गोष्टी टाळत होतो. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तक्रार दाखल केली आहे.

उदय सामंतांवर हल्ला

दोन दिवसांपूर्वी पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाईही केलीय. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा आरोप सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. तसंच हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना त्यांनी इशाराही दिलाय.

‘आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये’

असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.