लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने, प्रवाशांच्या सुरक्षेवरुन खडाजंगी

| Updated on: Sep 19, 2020 | 10:44 PM

मनसेने लोकलसेवा सुरु करण्याची मागणी केलीय. मात्र, त्यावरुनच सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत जुंपलीय (MNS and Shivsena fighting on Local train).

लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने, प्रवाशांच्या सुरक्षेवरुन खडाजंगी
Follow us on

मुंबई : मुंबईत सध्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकांचे रोज मेगाहाल होत आहेत. लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्यानं बसमधून प्रवास करताना सर्वसामान्य मुंबईकर मेटाकुटीला आलाय. त्यामुळं लोकलसेवा सुरु करण्याची मागणी मनसेनं केलीय. मात्र, त्यावरुनच सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत जुंपलीय (MNS and Shivsena fighting on Local train). लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने आल्याने येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

मागील काही दिवसांपासून मनसेने ठाकरे सरकारवर कोरोना संसर्गाला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला संसर्ग वाढला तर मनसे जबाबदारी घेणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एसटी 100 टक्के क्षमतेनं सुरु केली आहे, तर त्या प्रवाशांची जबाबादारी घेतली का? असा प्रतिप्रश्न विचारला आहे.

6 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करावी, यासाठी मनसे आणि सत्ताधारी शिवसेना वारंवार आमने सामने येत आहेत. लोकल सुरु केल्यावर कोरोनाचा संसर्ग वाढल्यास मनसे जबाबदारी घेणार का? असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. मात्रा आता एसटी बससेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं मनसेनंही त्याच शब्दात शिवसेनेवर पलटवार केला.

सध्या तरी सरकारची लोकलसेवा पूर्ववत करण्याची तयारी नाही. मात्र, दोन दिवसांआधीच सविनय कायदेभंगाचा इशारा दिल्याप्रमाणं, मनसेनं सोमवारी कार्यकर्त्यांसह लोकलनं प्रवास करण्याचं ठरवलंय. मनसे नेते संतोष धुरी यांनी घरात बसून सरकार चालवणाऱ्यांना काय कळणार? असा सवाल विचारला. तसेच आम्ही सोमवारी लोकलनं प्रवास करणार असल्याचं सांगितलं.

सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी सध्या काही लोकल धावतायत. मात्र त्यातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून लोकलमध्ये आधीप्रमाणंच गर्दी दिसतेय. तर इकडे बेस्ट बसेसची स्थिती त्याहूनही वाईट आहे. मुंबई आणि मुंबई शेजारील कल्याण डोंबिवलीपासून ते इकडे वसई विरारपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचेही तीन तेरा वाजलेत. लोकल बंद असल्यानं बस हा एकच पर्याय सर्वसामान्यांसमोर आहे. मात्र बसमध्ये चढण्यासाठीच दोन चे अडीच तास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यानंतर खड्ड्यांमुळं प्रवासाचे 3 तास आणि नंतर 9 तास ड्युटी असा प्रवाशांचा वेळ खर्च होत आहे. त्यामुळं सरकारनं ही बाबही नीट समजून घेतली पाहिजे, असं मत नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

Mumbai Bed Availability | मुंबईत 40 % ऑक्सिजन बेड, 210 ICU बेड, 126 व्हेंटिलेटर रिक्त

व्हिडीओ पाहा :

MNS and Shivsena fighting on Local train