काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?

| Updated on: Sep 29, 2021 | 9:17 PM

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे. कारण, तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.

काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us on

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे. कारण, तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. आता राज्यपाल कोश्यारी या अध्यादेशावर स्वाक्षरी करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Municipal Corporation 3 member ward system ordinance was sent to Governor)

काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीवर चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 सदस्यीय प्रभाग पद्धतीची मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र, शेवटी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर त्याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला. आता तो अध्यादेश राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत एकमत नाही

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. मात्र, या प्रभाग पद्धतीवरुन महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रभाग रचनेत बदल होण्याचे संकेत दिले होते. महापालिकेत 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झालेला आहे. याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं बंधन घालू नका. बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा होऊ शकते. आमच्या कार्यकारिणी बैठकीत दोन सदस्यीय प्रभाग असावा अशी चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी परत चर्चा होऊ शकते, असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले होते.

काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा ठराव

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद झाल्याची चर्चा

प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते. मात्र शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढत 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या :

अजितदादा, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, अनिल परबांचा का नाही?, नितेश राणेंचा सवाल

पुण्यात भाजप-मनसे युती नाहीच? राज ठाकरे पुन्हा 2 दिवसाचा दौरा करणार, मनसेचा नेमका आकडा किती?

Municipal Corporation 3 member ward system ordinance was sent to Governor