…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये

| Updated on: Feb 18, 2021 | 10:16 PM

"आंदोलनकर्ते शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठे बळ देऊ", असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले (Nana Patole slams BJP government over Delhi farmers protest)

...तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये
Follow us on

भंडारा : “मोदी सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. पण शेतकरीविरोधी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची भाषा मोदी सरकार करत असताना त्याचवेळी शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले जातात. या शेतकऱ्यांसोबत काँग्रेस भक्कमपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठे बळ देऊ”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत (Nana Patole slams BJP government over Delhi farmers protest).

दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भंडारामध्ये गुरुवारी (18 फेब्रुवारी) काँग्रेसने भव्य बैलगाडी आणि टॅक्टर रॅली काढली. या रॅलीला नाना पटोले संबोधित करत  होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, भंडारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश सरचिटणीस झिया पटेल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे  आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले. आज सहा वर्षे झाली तरी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट केले नाही. शेतमालाला दीडपट भावही दिला नाही. उलट शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव या नवीन कायदे आणून काढून घेतला, असं नाना पटोले म्हणाले.

“शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणून भाजपाने बदनाम केले. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारा व्यक्ती हा भाजपाचाच होता. त्याला भाजपनेच मोकळीक दिली आणि त्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडले. आतापर्यंत 200 शेतकरी शहीद झाले तरी मोदी सरकारला अजून जाग आली नाही. शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार?”, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विचारला.

हेही वाचा : ‘उदयनराजे फिरतायत, त्यांचं अभिनंदन, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट’, विजय वडेट्टीवार म्हणाले…