मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (shivaji park) दसरा मेळाव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घणाघाती हल्ला चढवला. पोकळ वल्गना आणि शिव्याशापापलिकडे या मेळाव्यात काही नव्हतं. यावेळचा शिवाजी पार्कवरचा मेळावा तमाशाकारांचा मेळावा होता. अशी टीका नारायण राणे (narayan rane) यांनी केली.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. मोठ्या मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण खूप मोठे झालो असं त्यांना वाटतं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. या माणसाला आपण कोण आहोत याचा कधी तरी जाणीव करून दिली पाहिजे. कोण तुम्ही? अपघाताने मुख्यमंत्री झालात. अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात आला, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील वक्तेही सुमार होते. बाळासाहेब असताना आम्ही चेंबूरवरून दसरा मेळाव्याला यायचो तेव्हा वक्त्यांचा आवाज यायचा. त्यांचं नाव होतं दत्ताजी साळवी. त्यावेळेचे वक्ते मोठे होते. आताच्या वक्त्यांचं नाव घेणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वक्त्यांचा दर्जा घसरला आहे. बौद्घिकता काय होती या वक्त्यांची? त्यांचा विधायक कामाचा काय अनुभव होता? केवळ राणेंवर टीका करण्यासाठी ही लोकं आणली होती, असा दावा नारायण राणे यांनी केला.
महाराष्ट्राच्या विकासात काय योगदान दिलं. मराठी माणसासाठी काय केलं एक तरी काम सांगा. 5 तारखेच्या मेळाव्यात सांगायला हवं होतं. हे केलं. हा उजेड पाडला मी. एकही सांगितलं नाही. विरळ विरळ माणसं बसली होती. उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा उजव्या बाजूने लोक निघत होती. साहेब बोलायला उभे राहिले तर जागेवरून एक माणूस निघत नव्हता. काय गुणवत्ता आणि पात्रता तुमची, असा हल्ला त्यांनी चढवला.
कालच्या मेळाव्यात आमच्या नेत्यांवर टीका केली. मी आधीच सांगितलंय ही टीका बंद नाही केली तर उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.