‘भाजीपाल्याला 100 पैकी 32 मार्क्स मिळतील इतकी खराब स्थिती’, विदर्भातील शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या कार्यशाळेत गडकरींचं परखड मत

| Updated on: Aug 16, 2022 | 6:23 PM

तुम्ही निर्माण करता त्या भाजीपाल्याला 100 पैकी मार्क द्यायचे झाले तर 32 मार्क मिळतील इतकी खराब स्थिती आहे. चोरीच्या मार्गाने सबसिडी घेऊ नका, इमानदारीने काम करा. सबसिडी घ्यायची गरज नाही, पण मिळते तर घ्या पण इमानदारीने, अशा शब्दात गडकरी यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांना खडे बोल सुनावले आहेत.

भाजीपाल्याला 100 पैकी 32 मार्क्स मिळतील इतकी खराब स्थिती, विदर्भातील शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या कार्यशाळेत गडकरींचं परखड मत
काय म्हणाले नितीन गडकरी
Image Credit source: Google
Follow us on

नागपूर : नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे एक व्हिजनरी नेता म्हणून सर्वज्ञात आहेत. देश-विदेशातही त्यांच्या कामाचे दाखले दिले जातात. तसंच स्पष्टवक्तेपणा आणि परखड मतासाठीही राजकारणात नितीन गडकरींची ख्याती आहे. नागपुरात आयोजित विदर्भातील शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या (Farmer Production Company) कार्यशाळेत गडकरींनी कंपन्यांना चांगलंच सुनावलं. तुम्ही निर्माण करता त्या भाजीपाल्याला 100 पैकी मार्क द्यायचे झाले तर 32 मार्क मिळतील इतकी खराब स्थिती आहे. चोरीच्या मार्गाने सबसिडी (subsidy) घेऊ नका, इमानदारीने काम करा. सबसिडी घ्यायची गरज नाही, पण मिळते तर घ्या पण इमानदारीने, अशा शब्दात गडकरी यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांना खडे बोल सुनावले आहेत.

नागपुरात लोटस गार्डन उभे राहणार

गडकरी म्हणाले की आपण चांगल्या प्रकारच्या ऑरगॅनिक भाज्या तयार केल्या पाहिजेत. त्याचा दर्जा आणि प्रॉडक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे. संत्र्याचा दर्जाही कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजेत. नर्सरीवाल्यांनी सत्र्याचे चांगले कलम तयार केले पाहिजेत. त्याचा दर्जा चांगला नसेल तर शेतकऱ्यांची फसवणूक होते. मी आता नागपुरात लोटस गार्डन करतोय, त्यात वेगवेगळ्या जातीची फुलंच फुलं दिसतील. मी सरकारमध्ये मंत्री असलो तरी मी आपल्या डोक्याने काम करतो. सरकारी कामात अनेक अडचणी असतात. मी आपल्याच विचाराने काम करतो. अनुभवातून अनेक प्रयोग केले जाऊ शकतात. विजेचा खर्च आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, असं गडकरी यांनी सांगितलं.

नितीन गडकरी दोन ड्राय पोर्ट बांधणार

त्याचबरोबर मी दोन ड्राय पोर्ट बांधणार आहे. त्यात एक जालना येथे तयार होणार आहे. तर एक शिंदीला तयार झालाय. जालन्यातून केळी थेट विदेशात पाठवली जाईल. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. मी आता ऑरगॅनिक बाजार तयार करतो आहे. त्या ठिकाणी ऑरगॅनिक भाज्या शेतकरी आणतील आणि त्या विकल्या की पैसे घेऊन जाईल, असंही गडकरी म्हणाले.

बावनकुळेंचं कौतुक, पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच!

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी बावनकुळेंचं तोंडभरुन कौतुक केलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर ती व्यक्ती पुढे काय काय होते, असं सूचक वक्तव्य गडकरी यांनी केलं. मात्र, त्याच वेळी पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलंय. मात्र फडणवीस हे जर पुढे दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची संधी असल्याचे सूतोवाचही यावेळी नितीन गडकरी यांनी केलं होतं.