Omraje Nimbalkar : मध्यरात्री 1 वाजता ओमराजे निंबाळकरांच्या घरी हाय-व्होल्टेज ड्रामा! अचानक वरुण देसाई…
Omraje Nimbalkar : पुण्यात मध्यरात्री मोठ्या घडामोडी घडल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी मध्यरात्री हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्यरात्री ठाकरेंचे दोन शिलेदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड केला आहे. हे खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, बंड केलेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने 20 वर्षांनी निकाल देत आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आता ओमराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर मध्यरात्री ठाकरेंचे दोन शिलेदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. मध्यरात्री वरुण सरदेसाई यांनी ओमराजेंची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं जाणून घ्या…
काय म्हणाले वरुण देसाई?
वरुण देसाई हे ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत कैलास पाटील देखील असल्याचे समोर आले आहे. पण दोघांनी ओमराजेंसोबत काय चर्चा केली याविषयी वरुण सरदेसाई यांनी फार काही सांगितलेले नाही. ओमराजेंच्या निवास्थानातून बाहेर पडल्यानंतर वरुण देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला असं वाटतं की आज ओमदादांच्या संदर्भातला जो निकाल लागला या निकालानंतर त्यांना जो अपेक्षित निकाल होता तो लागला नाही. त्यांची त्यांच्या परिवाराची एक विचारुण करायला म्हणून पक्षाच्या वतीने मी सचिव आहे, आमचे आमदार कैलास पाटील आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे. सविस्तर आमची काही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी काय माध्यमांसमोर बोलण्याची गरज नाही.
पुढे वरुण देसाई म्हणाले, ओमदादा हे आमच्या पक्षाकडून आमदार, तीनदा खासदार झाले. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत. त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढले तेव्हा ते आमदार झाले. शिवेसेनेकडून झाले. तीन वेळा खासदार झाले. ज्या विषयाकरता अट्टाहास होता त्याचा निकाल लागला त्यांच्या वडिलांच्या हत्ये संदर्भात आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना एक धक्का लागला होता या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील इकडे आलो आहे.
ओमराजे निंबाळकरांची भूमिका काय?
वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बंडखोरी आणि ऑपरेशन टायगरबाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून ओमराजे यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही हे स्पष्ट होत आहे. ओमराजे यांच्या या विधानामुळे त्यांच्यासोबत फुटणाऱ्या पाच खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे.
