PM Modi on Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष का फुटला? मोदींनी सांगितलं कारण, शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट हे नेमकं काय आहे? याबाबत नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

PM Modi on Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष का फुटला? मोदींनी सांगितलं कारण, शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा फोटो
Chetan Patil | Updated on: May 02, 2024 | 10:06 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्षाची विभागणी झालीय. या दोन गटांमधील वाद इतका टोकाला पोहोचला आहे की, शरद पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातीलच 2 महिला एकमेकांच्यासमोर निवडणुकीला उभ्या आहेत. त्यामुळे हा वाद किती टोकाचा आहे याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद कधी संपेल किंवा कुणाला या निवडणुकीत जास्त मतदान होईल? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या दोन गटामधील संघर्षावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबात मोठा गौप्यस्फोट केला. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा म्हणून टीका केली होती.

नरेंद्र मोदी राष्ट्रवादी पक्षाबद्दल काय म्हणाले?

“शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल? हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा? झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाहीत. ते महाराष्ट्राला काय सांभाळतील? सर्व इमोशन आमच्या बाजूने आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत’

नरेंद्र मोदी यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाहीत. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Follow Us