Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा नाहीच, अकोल्यात काँग्रेसने मोडली परंपरा मोडली, पहिल्यांदाच दिला मराठा उमेदवार
कॉंग्रेसने डॉ. अभय काशिनाथ पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता कॉंग्रेस, वंचित आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने येथे मराठा उमेदवार देऊन मुस्लीम उमेदवार देण्याची आपलीच परंपरा मोडीत काढली आहे.

मुंबई : राज्यात बारामतीनंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या अकोला लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेसने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आता कॉंग्रेसचे आव्हान असणार आहे. कॉंग्रेसने अकोला मतदारसंघातून डॉ. अभय काशिनाथ पाटील यांची उमदेवारी जाहीर केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत मतदारसंघ समजला जातो. मात्र, या मतदारसंघात कॉंग्रेसने गेल्या चार निवडणुकांची परंपरा मोडीत काढत प्रथमच मराठा उमेदवार दिला आहे.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. 1989 पासून या मतदारसंघावर पांडुरंग फुंडकर यांच्या रूपाने भाजपचा झेंडा फडकला होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी 1998 आणि 1999 या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपची ही परंपरा खंडित केली आणि लोकसभेत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर झालेल्या चार लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. जागावाटपावरून त्यांची बोलणी फिस्कटली आणि वंचित आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविली. मात्र, त्याचा फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे तब्बल 8 लोकसभा जागा आघाडीच्या हातून निसटल्या. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी वंचितने आधी शिवसेनेसोबत युती केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेलाही प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले. पण, पुन्हा 2019 प्रमाणेच जगावाटपावरून प्रकाश आंबडेकर यांनी इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
अकोला लोकसभा जागेचा निर्णय प्रलंबित असतानाचा कॉंग्रेसने डॉ. अभय काशिनाथ पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता कॉंग्रेस, वंचित आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने येथे मराठा उमेदवार देऊन मुस्लीम उमेदवार देण्याची आपलीच परंपरा मोडीत काढली आहे.
1957 ते 62 या काळात अकोला मतदारसंघात गोपालराव खेडकर यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. तर, 1962 – 67 या काळात एम. एम. हक् आणि 67 ते 77 अशी दहा वर्ष के.एम. असगर हुसैन हे कॉन्ग्रेस्क्व्हा तिकिटावर निवडून आले होते. तर, 72 ते 77 वसंत साठे, 80 ते 89 मधुसूदन वैराळे हे कॉंग्रेस उमेदवार निवडून आले होते. कॉंग्रेसच्या या किल्ल्याला भाजपचे पाडुरंग फुंडकर यांनी सुरुंग लावला. 89 ते 98 पर्यंत सलग तीन निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यांच्यानंतर 2004 ते 2019 अशी चार वर्ष भाजपचे संजय धोत्रे विजयी झाले आहेत. संजय धोत्रे यांच्याविरोधात कॉंग्रेसने हिदायत पटेल यांना उतरवले होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे त्यांना प्रभाव स्वीकारावा लागला होता.
अकोला मतदारसंघात मराठा – 25 टक्के, कुणबी -12 टक्के, दलित – 20 टक्के, आदिवासी – 08 टक्के, अल्पसंख्यांक – 15 टक्के आणि इतर (माळी, धनगर, हिंदी भाषिक आणि इतर) – 20 टक्के मतदार आहेत. त्यामुळे हे जातीय समीकरण लक्षात घेता कॉंग्रेसने येथून डॉ. अभय काशिनाथ पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
