आदित्य ठाकरेंनी स्वत:हून सुरक्षा कवच सोडावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

| Updated on: Sep 16, 2022 | 1:28 PM

राज्यात कोठेही दुधाचा तुटवडा नाही. जर कोणी दुधाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल. लम्पी आजाराबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येार आहेत.

आदित्य ठाकरेंनी स्वत:हून सुरक्षा कवच सोडावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी त्यांचं सरकार गेलंय हे लक्षात ठेवावं. त्यांनी स्वत:हून आपलं सुरक्षा कवच सोडावं. स्वत:चं ग्लोरीफिकेशन करणं थांबवावं, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. यावेळी विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावरही टीका केली आहे. आमच्या सरकारवर टीका करण्यापूर्वी शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी राज्यात कोणते प्रकल्प आणले? जनहिताची कोणती कामे केली? असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी इयत्ता 5 वीपासून कृषी शिक्षण देण्याच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. या आधी कृषीमंत्री असताना इयत्ता 8वी पासून कृषी शिक्षणाचा प्रस्ताव आणला होता. आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही विचार करून धोरणात्मक निर्णय घेऊ, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

फॉक्सकॉन वेदांता बाहेर गेला याला महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांनी योग्य पाठपुरावा केला नाही. तिघांचे आघाडी सरकार होते. त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला नाही. तरीदेखील आता आमचं सरकार मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

लम्पी आजाराबाबत आम्ही उपाययोजना सुरू केली आहे. राज्यात 2 कोटी पशूधन आहे. त्यापैकी 4 हजार पशूधनाला आजार झाला आहे. योग्यवेळी उपाययोजना केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. इतर राज्याच्या तुलनेत आपल्याकडे या आजाराची लागण अधिक नाहीये. मी स्वत: जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करत आहे. तसेच संपूर्ण राज्यात पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काल एका दिवसात एक लाख लसीकरण करण्यात आलं आहे. 75 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. याचा 100 टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात कोठेही दुधाचा तुटवडा नाही. जर कोणी दुधाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल. लम्पी आजाराबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येार आहेत. एकूण 25 लाख लस उपलब्ध होणार आहे.