“योगींच्या नव्या फिल्मसिटीचे देशभरात स्वागत, सरकारच्या पोटात काय दुखतंय?”, राम कदमांचा टोला

| Updated on: Dec 02, 2020 | 7:11 PM

योगी आदित्यनाथ नवी फिल्मसिटी तयार करत आहेत. राज्य सरकारच्या पोटात काय दुखत आहे, असे राम कदम म्हणाले. (Ram Kadam Yogi Adityanath)

योगींच्या नव्या फिल्मसिटीचे देशभरात स्वागत, सरकारच्या पोटात काय दुखतंय?, राम कदमांचा टोला
Follow us on

मुंबई : “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशमध्ये नवी फिल्मसिटी तयार करत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे भारत देशाने स्वागत केले आहे मात्र, राज्य सरकारच्या पोटात काय दुखत आहे?; तेच समजत नाही,” असा टोला भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी राज्य सरकारला लगावला. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Ram Kadam comments on Yogi Adityanath visit of Mumbai and bollywood)

“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये नवी फिल्मसिटी तयार करत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले आहे. मात्र, राज्य सरकारच्या पोटात काय दुखत आहे. तेच समजत नाही,” असं राम कदम म्हणाले. तसेच, यावेळी कोरोना काळात चित्रपटसृष्टीत झालेल्या नुकसानावरही त्यांनी बोट ठेवलं. लॉकडाऊनच्या काळात सर्व चित्रपट, मालिकांचे चित्रकरण तसेच प्रदर्शन बंद होते. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यावर बोलताना “कोरोनाकाळात राज्यातील फिल्मसिटीचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्राला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही,” असे म्हणत कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली.

बॉलिवूड यूपीत घेऊन जात असल्याचा आरोप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी योगी देशातील प्रतिष्ठित उद्योजक आणि बॉलिवूड कलाकार, निर्माते यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवणे आणि दुसरी चित्रपट नगरी निर्माण करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीने योगींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.

“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही, मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असं नातं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे 1 डिसेंबर रोजी म्हणाल्या होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

बॉलिवूड मुंबईतच राहील : योगी

दरम्यान, बुधवारी (2 डिसेंबर) योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीने केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. “आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत. बॉलिवूड मुंबईतच राहील,” असं प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

“बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत,” असंही योगी म्हणाले.

संबंधित बातम्या :

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

Akshay Kumar | अक्षय कुमार-योगी आदित्यनाथ भेट, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी नव्हे ‘या’ खास विषयावर चर्चा!

(Ram Kadam comments on Yogi Adityanath visit of Mumbai and bollywood)