मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे

| Updated on: Sep 26, 2019 | 3:46 PM

एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्ष लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असं रावसाहेब दानवे पुण्यातील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले.

मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे
Follow us on

पुणे : भाजपमध्ये होत असलेल्या मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटत आहे, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve on BJP Megabharati) यांनी केलं आहे. पुण्यातील वडगाव मावळमध्ये विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना दानवेंनी मेगाभरतीवर मिष्किल शब्दांत टिपण्णी केली.

पक्षात माणसं कमी नाहीत उलट दुसऱ्या पक्षातील नेते इकडे येत असताना आम्ही जीव मुठीत धरुन बसलो होतो. मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ की काय अशी भीती वाटत आहे, असं रावसाहेब दानवे म्हणताच एकच हशा पिकला.

एक काळ असा होता, ज्यावेळी एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्षे लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून काही मतदारसंघांत पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले.

Viral वास्तव : अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत?

पक्ष बदलून जे कार्यकर्ते आपल्यात आले (Raosaheb Danve on BJP Megabharati) ते सहज आलेले नाहीत, विचार करुन आलेले आहेत. भाजपमध्ये जमेल का? तिथे आपल्याला सांभाळून घेतले जाईल का? अशा प्रश्नांमुळे त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. पण त्यांनी हिंमत केली आणि भाजपमध्ये आले. जुन्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना बैलासारखी शिंग मारु नयेत, त्यांना सांभाळून घ्यावं, असं आवाहन दानवे यांनी केलं.

अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही बँक बरखास्त केली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून बँक घोटाळा केल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सहकारी बँक बरखास्त केली, तेव्हा अजित पवार बँकेचे संचालक होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच संगनमताने ही बँक बरखास्त केली. या बँकेच्यामार्फत तुम्ही 13 कारखान्यांना एक हजार कोटींपेक्षा अधिक कर्जांचे वाटप केले. ते कारखानेही दिवाळखोरीत निघाले आणि त्यानंतर या कारखान्यांना ज्यांनी दिवाळखोरीत काढले त्यांनीच ते विकत घेतले. तसेच या बँकांना पुन्हा कर्ज का देण्यात आलं?, असा सवालही दानवेंनी यावेळी केला.