सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार मूळ शिवसेना असल्याचा दावा करणार? पडद्यामागच्या मोठ्या हालचाली काय?

ठाकरे गटाला पुन्हा फुटीचा धोका, 6 बंडखोर खासदार 'उबाठा' गटावर दावा करणार असल्याची शक्यता बळावली आहे. माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांच्या मते, बंडखोरांना मूळ शिवसेना असल्याचं सिद्ध करावं लागेल, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह व गट गमवावा लागू शकतो.

सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार मूळ शिवसेना असल्याचा दावा करणार? पडद्यामागच्या मोठ्या हालचाली काय?
उद्धव ठाकरे
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2026 | 12:38 PM

तब्बल चार वर्षानंतर ठाकरे गटा पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. हे सहाही खासदार केव्हाही वेगळं होण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता बळावली आहे. हे खासदार संसदेत आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांना आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा करावा लागणार आहे. मूळ शिवसेना असल्याचा दावा करणं म्हणजेच उबाठा गटावर दावा सांगणं असा त्याचा अर्थ होतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट बंडखोर खासदार बळकावणार का? अशी चर्चा रंगली आहे. यानुषंगाने दिल्लीत नेमकं काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याच्या विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी खासदार फुटीवर भाष्य केलं आहे. कायद्याच्या बाजू काय आहेत? बंडखोर खासदारांसमोर कोणकोणते पर्याय आहे? आणि राज्याच्या राजकारणात काय घडू शकतं? यावर कळसे यांनी भाष्य केलं आहे. मात्र, यातील कळसे यांनी एक कायदेशीर बाजू समोर आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांना आपणच मूळ शिवसेना आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे, असं अनंत कळसे यांनी म्हटलं आहे. याचाच अर्थ बंडखोर खासदार उबाठा गटावर दावा करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. म्हणजे ठाकरेंच्या हातून आहे तो गटही निसटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कळसे नेमकं काय म्हणाले?

अनंत कळसे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बऱ्याच कायदेशीर बाजूंवर प्रकाश टाकला. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद देसाई यांनी व्हिप जारी केला आहे. पण हे फुटणारे खासदार जर बैठकीला आले नाही तर त्यांच्यावर कारवाई ही होऊ शकते, असं कळसे यांनी म्हटलं आहे.

पण या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केला तर त्यांना दावा करावा लागणार की मूळ शिवसेना आम्ही आहोत. तसेच या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केला तर त्याला मान्यताही मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. पक्ष फुटल्यानंतर अनेक याचिका या सुप्रीम कोर्टात आहेत. यासंदर्भातील निकाल हा लवकर लागला पाहिजे. नाहीतर पुढे येणाऱ्या याचिका या प्रलंबित राहतील आणि हे लोकशाहीला अपेक्षित नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हिस्ट्री रिपीट?

ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसून आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार होते. कालांतराने त्यांच्याकडे 12 खासदार आले. या सर्वांनी मिळून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगाने त्याला मान्यताही दिली होती. शिंदेंकडे शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह सोपवलं होतं. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आताच्या परिस्थितीत इतिहासाची तीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कळसे यांच्या मते या सहाही खासदारांना आम्हीच मूळ शिवसेना आहोत, असा दावा करावा लागणार आहे. तसा दावा या खासदारांनी केल्यास उद्धव ठाकरे यांच्या हातून आहे तो गट जाऊ शकतो. परिणामी पक्ष आणि मशाल या पक्ष चिन्हापासून ठाकरेंना मुकावं लागू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us